नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात देशात गेल्या 44 वर्षातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद भारतीय हवामान खात्याने केली आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये जितका पाऊस पडतो त्याच्यापेक्षा यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 25 टक्के जादा पाऊस पडला आहे.
हवामान खात्याकडील आकडेवारीची माहिती घेतली असता 1983 साली ऑगस्ट महिन्यात 23.8 टक्के इतका जादा पाऊस पडला होता. ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद 1976 साली झाली आहे. त्यावेळी तो 28.4 टक्के जादा पडला होता. दरम्यान, देशात यंदाच्या पावसाळात आतापर्यंत सरासरीच्या नऊ टक्के इतका जादा पाऊस पडला आहे.
सिक्कीम, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडृ, गुजरात, गोवा या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्यवर्ती जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देशातील धरणांमधील पाणीसाठा हा गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातील पाणीसाठ्यापेक्षा अधिक झाला आहे. गंगा, नर्मदा, तापी, माही, साबरमती, या खोऱ्यातील धरणांमध्येही सरासरीपेक्षा आज अधिक साठा तयार झाला आहे असे या आयोगाने म्हटले आहे.
तथापि जम्मू-काश्मीर, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. देशात 1 जून ते 30 सप्टेंबर हा पावसाचा सीझन मानला जातो. त्यानुसार जून महिन्यात सरासरीच्या 17 टक्के जादा पाऊस नोंदवला गेला. तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा 10 टक्के कमी पाऊस झाला आहे.