पाथर्डी : श्री क्षेत्र तारकेश्वर गड दानपेटी चोरी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी ,संबंधित प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावा,चोरी गेलेली दानपेटीतील रक्कम संबंधीत आरोपीकडून हस्तगत करावी अशी मागणी गडाच्या भाविकांनी बीडचे जिल्हा पोलीस प्रमुख नंदकुमार ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सात दिवसात यावर काही कारवाई न झाल्यास गडाच्या हजारो भक्तांना घेऊन आंदोलन करू असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. गेल्या महिन्याचा सहा तारखेला तारकेश्वर गडावर असलेली दानपेटी चोरटयांनी चोरून नेत त्या दानपेटीतील सहा लाख रुपयांची रोकड लंपास केली होती.
या संदर्भात गुन्हा दाखल होऊनही अद्याप पर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात बीड पोलिसांना यश आले नाही तर या चोरी प्रकरणात काही संशयित आरोपींची नावे सुद्धा पोलिसांना देण्यात येऊनही पुढे काहीच न घडल्याने आज तारकेश्वर गडाचे भाविक व पंचायत समितीचे माजी सभापती उद्धव वाघ,बीड जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य माउली जरांगे व शिवाजी नाकाडे, ॲड. वैभव आंधळे,माजी पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ यांनी आज बीड चे जिल्हापोलीस प्रमुख नंदकुमार ठाकूर यांची भेट घेत त्यांना एक निवेदन दिले असून त्या मध्ये म्हंटले आहे कि गडावरील चोरी प्रकरणी अद्याप पर्यंत एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
या संदर्भात काही संशयित नावे पोलिसांना देण्यात आले असून यातील एका अल्पवयीन संशयित आरोपीच्या फोन कॉल चे रेकॉर्डिंग तपासले असता त्याचे घटना घडली त्या दिवशी इतर संशयित चार आरोपीशी बोलणे झाले आहे. अल्पवयीन आरोपीने काहींची नांवे पोलीस तपासात सांगितल्याने तपासात प्रगती होऊन आरोपीना अटक होईल असे वाटत होते मात्र तसे घडले नाही उलट यातील सांगळे याने गडावर येऊन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना धमकी दिली आहे. येत्या सात दिवसात या घटनेतील आरोपींना अटक झाले नाही तर गडाच्या हजारो भक्तांसह आम्ही आंदोलन करू असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.