नवी दिल्ली – सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राला विदर्भकडून पराभव पत्कावा लागला. या पराभवामुळे महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत साखळी सामन्यांत सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी केलेल्या महाराष्ट्राला ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीचा फटका बसला. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20
सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाल्यामुळे मुश्ताक अली स्पर्धेतून तो बाहेर पडल्यावर लगेचच महाराष्ट्राला पराभवाचा धक्का बसला.
विदर्भचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकत महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी दिली. राहुल त्रिपाठीच्या 66 तर यश नहारच्या 29 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या अन्य फलंदाजांना अपयश आले. त्यामुळे त्यांना 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 157 धावाच करता आल्या.
विदर्भकडून यश ठाकूरने 3 तर, अक्षय कर्णेवारने 2 गडी बाद केले. विदर्भने अथर्व तायडे व कर्णधार अक्षय वाडकर यांनी दमदार अर्धशतके फटकावली व 18 व्या षटकातच 3 बाद 160 धावा करत विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक –
महाराष्ट्र – 20 षटकांत 8 बाद 157 धावा.(राहुल त्रिपाठी 66, यश नहार 29, यश ठाकूर 3-17, अक्षय कर्णेवार 2-25). विदर्भ – 17.5 षटकांत 3 बाद 160 धावा. (अथर्व तायडे 56, अक्षय वाडकर नाबाद 58, जितेश शर्मा नाबाद 28, मुकेश चौधरी 1-24, अझीम काझी 1-29, अक्षय पालकर 1-33).