नवी दिल्ली – देशातील कोविडच्या लाटेत अनेक जण मरण पावले आहेत. पण अनेक मृतांच्या नातेवाईकांना अजून तसा उल्लेख असणारा मृत्यू दाखलाच मिळालेला नाही. हे मृत्यू दाखले जारी करा आणि त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करा असा आदेश सुप्रीम कोर्टाने 30 जुनलाच दिला आहे.
त्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत काय निर्णय घेतला याची माहिती आम्हाला 11 सप्टेंबर पर्यंत सादर करा असा आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिला आहे. सरकारने यासाठी दहा दिवसांचा अवधी मागितला होता. पण कोर्टाने त्यांना तितका वेळ देण्यास नकार दिला.
सुप्रीम कोर्टाने सरकारला पुरेसा वेळ दिला आहे आता अधिक वेळ देण्याची गरज नाही. तिसरी लाटही येऊन जाईल पण अजून सरकारने या विषयीची भूमिकाच स्पष्ट केलेली नाही, हे उचित नाही असेही कोर्टाने यावेळी सरकारला बजावले.
कोविड काळात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला केंद्र सरकारने नुकसानभरपाई दिलीच पाहिजे. त्यासाठी आपत्ती निवारण प्राधिकरणाला या नुकसान भरपाईची रक्कम निश्चीत करण्याचा आदेश दिला आहे. जो व्यक्ती कोविडने मरण पावला आहे त्याच्या मृत्यू दाखल्यावर तसा स्पष्ट उल्लेख केला पाहिजे. ज्या दाखल्यावर असा उल्लेख नाहीं ते दाखले दुरूस्त करून द्या असेहीं कोर्टाने सरकारला सांगितले आहे.