देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूतील इंद्रायणी नदी पात्रामध्ये दूषित दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे होणारे मिश्रण आणि वाढत्या जलपर्णीमुळे इंद्रायणी गटारगंगा बनत आहे. मंगळवारपासून दूषित पाण्यामुळे तीर्थक्षेत्र देहूगाव येथे इंद्रायणी नदीतील माशांचा मृत्यू होऊ लागला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूगाव येथील स्मशानभूमी आणि पवित्र इंद्रायणी नदी काठचा विकास करीत लाखो रुपये खर्चून घाट बांधण्यात आले आहेत. घाटांवरील आकर्षक मेघडंबरी, वृक्षारोपण, हायमास्क सुरू असलेल्या बोटींगमुळे परिसर पर्यटनस्थळ बनले आहे. वर्षातून तीन वेळा भरणाऱ्या मोठ्या यात्रा तसेच श्री संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी असल्याने प्रतिदिन हजारो वारकरी, भाविक संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनार्थ तर पर्यटक पर्यटनासाठी तीर्थक्षेत्र देहू येथे येतात.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा गाथा या पवित्र इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवली. परंतु गाथा पुन्हा कोरडी प्राप्त झाल्याने वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने इंद्रायणीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद खाण्यासाठी गंधर्व, किन्नर यांनी मस्य (मासा) रूपामध्ये अवतार घेतला असल्याचे अख्यायिका आहे. या माशांना देवमासे (खवली मासे) असेही म्हणतात.
हे मासे देहू वगळता इतरत्र कोठेही आढळून येत नसल्याचे सांगण्यात येते. या माशांचा संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यात उल्लेख आढळून येतो. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूत मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण शुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
परंतु अनेक दिवसांपासून देहूतील मलनिस्सारण शुद्धीकरण प्रकल्प बंद आहे. अनेक ठिकाणी चेंबरमधून मैलामिश्रित दूषित सांडपाणी तर नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या वाहिन्या व फुटलेल्या चेंबरमधून मैलामिश्रित पाणी नदीपात्रात मिसळत आहे. तसेच नदीपात्रामध्ये जलपर्णीचे प्रमाणही वाढत आहे. मैलामिश्रित सांडपाणी आणि जलपर्णीमुळे माशांना जलचरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून दोन दिवसांपासून नदीपात्रातील माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत. दोन वर्षांपूर्वी ही माशांच्या मृत्यूची घटना घडली होती. त्यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत.
कपडे धुण्यासाठी घाटांचा वापर
इंद्रायणी नदी घाटावर कपडे धुण्याचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्रामध्ये मृत व्यक्तीचे कपडे किंवा अनावश्यक असलेले गोधड्या टाकून देणे, दशक्रिया विधी नंतर निर्माल्य तसेच मडकी, पूजेनंतर उर्वरित साहित्य नदीपात्रात टाकून देणे, केमिकल युक्त दूषित व मैलामिश्रित सांडपाण्याचे नदीत होणारे मिश्रण, धुतलेल्या कपड्यांमुळे फेसाळणारे साबणाचे केमिकलने पाणी, वाढते जलपर्णी तसेच वाळू उपसा यामुळे दूषित होणारे पाणी अशा अनेक कारणांमुळे पवित्र इंद्रायणी गटार गंगा होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासह जलचरांचे ही आरोग्य धोक्यात येत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.