उमेश सुतार
कराड-चिपळूण मार्गावरील भयावह स्थिती
कराड – कराड-चिपळूण महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कूर्मगतीने सुरू असल्याने प्रवासी व वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मार्गावर अनेक धोकादायक वळणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. बहुतांश ठिकाणी वळणांवर रस्ते दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. रस्त्याचे काम सुरू असताना गतिरोधक नसल्याने होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहनांच्या अतिवेगामुळे या मार्गावरील प्रत्येक वळणावर मृत्यू घुटमळत आहे.
कराड-चिपळूण मार्गावर अनेक धोकादायक वळणे असून या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या वळणांमुळे अपघात झाले की, परिसरातील ग्रामस्थांकडून अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली जात आहे. मात्र, अपघात टाळण्यासाठी वळणांच्या ठिकाणी सूचना, दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. त्याकडे ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे.
या मार्गावर पाटण तालुक्यात मल्हारपेठ, नवसरी, तेलेवाडी, नवारस्ता, अडूळ येथे अत्यंत धोकादायक वळणे आहेत. या वळणांवर समोरून आलेले वाहन दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. येथील रस्ता चौपदरी नसून तीनपदरी आहे. एका बाजूला दोन वाहनेही बसत नाहीत.
रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक नसल्याने मोठे अपघात होण्याची भीती प्रवासी व वाहनचालक व्यक्त करत आहेत. चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची बेसुमार कत्तल केल्याने आणि या मार्गावर कुठेही निवाऱ्यासाठी शेड नसल्याने प्रवाशांना एसटी अथवा खासगी वाहनांची वाट पाहण्यासाठी उन्हातान्हात उभे रहावे लागत आहे. या मार्गावर बसथांब्यांच्या शेडस् उभारण्याची मागणी होत आहे.
चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने आजूबाजूच्या गावांमधून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांना सेवा रस्त्याअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकंदरीतच कराड-चिपळूण मार्ग असुविधांच्या कचट्यात सापडल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.
कराड-पाटण रस्त्यावर धोकादायक वळणे
कराड-पाटण या सुमारे 34 किलोमीटरच्या अंतरात नऊ धोकादायक वळणे आहेत. विहे घाटातील “एस’ आकारचे वळण अत्यंत धोकादायक असल्याने येथे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. चौपदरीकरण पूर्ण झाल्यावर अपघातांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.