प्रशस्त पत्राशेड, बैठक व्यवस्था व प्रवचन मंच उभारणी सुरू
आळंदी – येथील प्रशस्त इंद्रायणी नदी घाटावर निवाऱ्याअभावी गेल्या 20 ते 25 वर्षे दशक्रिया विधी पार पाडताना ऊन, वारा, पाऊस यांचा प्रतिकार करताना मृतांच्या नातेवाईकांना होणार त्रास व त्यांची होणार गैरसोय आता दूर होणार आहे. आळंदी ग्रामस्थांच्या पुढाकाराने इंद्रायणी घाटालगत प्रशस्त पत्राशेड, बैठक व्यवस्था व प्रवचन मंच उभरण्यात येत आहे, यासाठी जवळपास दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असून अनेक दनशूरांच्या पुढाकारातून हे काम मार्गी लागत आहे.
आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी सभापती डी. डी. भोसले पाटिल, आनंद मुंगसे, विलास सोपान कुऱ्हाडे, अरुण घुंडरे यांच्या पुढाकारातून या कामाला सुरुवात झाली असून या कामाकरिता दिवंगत माजी नगराध्यक्ष बबनराव सर्जेराव घुंडरे पाटील यांच्या स्मरणार्थ विमलताई बबनराव घुंडरे पाटील यांच्या वतीने पत्राशेड व फरशीच्या कामाकरिता पाच लाख, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने संरक्षक जाळी व इतर कामे याकरिता दोन लाख तीस हजार, कृष्णा थोरवे यांच्याकडून प्रवचन मंच, भिंतीला स्टाईलचे काम करून देण्यात येणार आहे. माजी नगरसेवक आनंद मुंगसे व परिवाराकडून 51 हजार, अनिल कुऱ्हाडे यांच्याकडून 11 हजार रुपये व इतर देणगीदारांच्या सहकाऱ्यातुन हे काम मार्गी लागत आहे.
ग्रामस्थांच्या या कार्याला सहकार्य करत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने 2 लाख 30 हजार रुपये मदत व कायम स्वरूपी विद्युतपुरवठा केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने संस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड.विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांचा सत्कार करण्यात आला, तर साई फॅब्रिकेशनचे सुभाष बोराटे यांना कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, अरुण घुंडरे, माऊली गुळुंजकर, एम. डी. भोसले पाटील, मुरलीधर पाटील, काळूराम शिवले आदी मान्यवर उपस्थित होते.