पाचगणी -कांदाटी खोऱ्यातील 16 गावांमध्ये अतिवृष्टीमुले मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून शासकीय यंत्रणांकडून नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत.
अतिवृष्टीमुळे दि. 22 आणि 23 जुलै रोजी कांदाटी खोऱ्यामध्ये शेतीचे कधीच न भरून येणारे नुकसान झाले आहे. कांदाटी खोरे अतिदुर्गम भागात मोडते. पिंपरी, आकल्पे, निवळी, लामज, वाघावले, उचाट, झालोशी, कांदाट, झाडाणी – दोडाणी, मोरणी, महाळुंगे, पू. मोरणी, आराव, वलवण, चकदेव, शिंदी अशी 16 गावे.
शेती हाच मुख्य व्यवसाय. परंतु, काळाने एका रात्रीत घाला घातला व होत्याचे नव्हते झाले. लोकांची शेती पूर्णपणे नापिक झाली. मोठमोठे डोंगर भूस्खलनाने खाली आले. 5 ते 6 फूट शेतजमीन गाडली गेली. सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र मारुती निवळे, शिवराम चव्हाण, शशिकांत भातोसे, दीपक जाधव, रामचंद्र ढेबे यांनी या भागातील नुकसानीची माहिती दिली.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही डोंगरातून होती. परंतु, डोंगरच खाली आल्याने पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनच नेस्तनाबूत झाल्या. जागोजागी रस्ते, पायवाटा तुटल्याने व साकव, पूल वाहून गेल्याने दळणवळणाचा मार्ग बंद झाला. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रानोरान भटकावे लागते.
शासनाने येऊन पंचनामे केले. परंतु, अद्याप कोणतीही सुविधा भागात पोहचली नाही. सेवाभावी संस्था, ट्रस्टी, सामाजिक मंडळे यांनी धान्य स्वरूपात मदतीचा हात दिला. परंतु शासनाची कोणतीही मदत नाही, असे लोक सांगतात.
निवळी गावाच्या माथ्यावरील डोंगराला मोठमोठे तडे गेल्याने लोक अजूनही चिंतेत असून या गावाचे तात्काळ पुनर्वसन करणे गरजेचे आहे, अशी या भागातील जनतेची अपेक्षा आहे.