नवी दिल्ली : भारतात करोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातच आता वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात चिंता वाढवणारा निष्कर्ष समोर आला आहे. त्या निष्कर्षानुसार भारतात येत्या काही दिवसात पाच हजार जणांचा कोरोनाने मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या सातत्याने भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढत आहे. एप्रिल ते जुलै या काळात भारतातील तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यामध्ये आता दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची भर पडतेय. गेल्या चार दिवसात देशात 13 लाख नव्या रुग्णांची भर पडली असून शनिवारी जवळपास साडेतीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच शनिवारी एकाच दिवशी 2767 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ही आकडेवारी जगाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, सध्या जो कोरोनामुळे मृतांचा आकडा दोन ते तीन हजारांच्या दरम्यान आहे, तो पुढच्या महिन्यापासून पाच हजारांच्या वर जाण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुलै या अडीच महिन्यांच्या काळात जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे असेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
लसीकरण महत्वाचे –
देशातील कोरोनाचे संकट टाळायचे असेल तर लसीकरणाच्या कार्यक्रमाचा वेग वाढवायला हवा. सरकारने देशातील लसींचा पुरवठा वाढवायला हवा. लवकरात लवकर सर्वांचं लसीकरण करायला हवं. त्यामुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याद्वारे पुढची हाणी टाळता येईल, असेही त्या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
सदर बातमी ही वाचकांना घाबरवण्यासाठी नाहीतर, सतर्क करण्यासाठी वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.
स्वतःची काळजी घ्या. कोरोना नियमांंच पालन करा.