पुणे: सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने (कस्टम-नार्कोटिक्स विंग) अंमली पदार्थांचा मोठा साठा नळदुर्ग-सोलापूर रस्त्यावर पकडला. या कारवाइत कस्टमने चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले.
आंध्र प्रदेशातून गांजा आणि चरस अशा अंमली पदार्थांचा साठा महाराष्ट्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती कस्टमच्या अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर कस्टमच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या रस्त्यांवर कस्टमच्या पथकाने नजर ठेवली होती.
नळदुर्ग-सोलापूर रस्त्यावरील बोरमणी गावाजवळ दोन ट्रक संशयावरून थांबवले. कस्टमच्या पथकाने ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये पोत्यात भरलेला गांजा आढळून आला. तसेच, दुसऱ्या एका ट्रकमध्ये साडेसात किलो चरस सापडले.
याप्रकरणी चौघांना अटक केली असून जप्त केलेल्या 858 किलो गांजाची किंमत 1 कोटी 4 लाख रुपये आहे. चरसची किंमत 75 लाख रुपये आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे, असे सहआयुक्त पतंगे यांनी सांगितले.