हप्ते भरूनही रक्कम मिळत नसल्याने खेडमधील बळीराजा आंदोलनाच्या पवित्र्यात
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील जवळपास 3 हजार 420 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता मात्र, त्यांना अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची विमा रक्कम अद्यापही मिळाली नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्यात 3 कोटी 51 लाख 8 हजार 386 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले, असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 35 हजार 389 शेतकऱ्यांचे 12 हजार 163 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. पहिल्या टप्प्यात 1 कोटी, 60 लाख 98 हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते. 21 गावांतील 2823 शेतकऱ्यांना 1 कोटी 60 लाख 98 हजार रुपयांची नुकसानभरपाई आतापर्यंत वाटप करण्यात आली होती.
32 हजार 566 शेतकरी नुकसानभरपाई 8 कोटी 13लाख 760 रुपये मळण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यापैकी दुसऱ्या टप्यात 3 कोटी 51 लाख 8 हजार 386 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. पहिला आणि दुसरा टप्पा असे मिळून 5 कोटी 12 लाख 6 हजार 386 रुपये नुकसानभरपाई खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्राप्त झाली असून, ही रक्कम पुढील आठ ते दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील 1 कोटी 60 लाख 98 हजार बॅंक खात्यात वर्ग
अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील 84 गावांमध्ये 1438 हेक्टर क्षेत्राला बसला होता. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी खेड तालुक्यातून 9 कोटी 74 लाख 11 हजार 760 रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामसेवकांच्या पंचनाम्यानुसार शासनाला पाठवण्यात आला होता.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पहिल्या टप्यातील 1 कोटी 60 लाख 98 हजार रुपयांचे अनुदान मिळाले. हे सर्व अनुदान वितरीत करण्यात आले असून 21 गावांमधील 3 हजार 840 लाभार्थ्यांना त्यांच्या बॅंक खाती वितरीत करण्यात आले.