नवी दिल्ली – देशात करोना व्हायरचा प्रसार वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र सर्वात जास्त रूग्णवाढ देशातील 19 जिल्ह्यात होत आहे, आणि त्यातील 15 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व 19 जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. सोमवारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 10 दिवसांत करोना व्हायरसचे सर्वात जास्त रूग्ण पुणे जिल्ह्यात आढळले आहेत. गेल्या 10 दिवसांतील सर्वात जास्त करोनाचे रूग्ण ज्या जिल्ह्यांत आढळले आहेत त्यात पहिले सात जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.
सर्व 19 जिल्ह्यांत मध्य प्रदेशातील इंदोर, कर्नाटकातील बंगळुरू अर्बन, तमिळनाडूतील चेन्नई आणि पंजाब मधील जालंधर सोडून सर्व जिल्हे महाराष्ट्रात आहेत. पुणे, नागपूर आणि मुंबईत तर गेल्या 10 दिवसांत दररोज 1000 हून अधिक करोनाची प्रकरणं समोर आली आहेत.
पुण्यात गेल्या 10 दिवसात एकूण 26,218 करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर नागपूर मध्ये 20104 करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. येथे 10 दिवसात 11859 करोनाची प्रकरणं समोर आली आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर ठाणे जिल्हा आहे. येथे 10914 रूग्णांची नोंद झाली आहे. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर नाशिक, औरंगाबाद आणि जळगांव जिल्हे आहेत. येथे गेल्या एका आठवढ्यात क्रमश: 9024,6652 आणि 3962 करोनाबाधितांची नोंद झाली आहे.
यादीत आठव्या क्रमांकावर मध्य प्रदेशातील इंदोर जिल्हा आहे. येथे गेल्या 10 दिवसात 5238 करोनाबाधित झाले आहेत. नवव्या क्रमांकावर कर्नाटकमधील बंगळुरू अर्बन जिल्हा आहे. येथे 5047 प्रकरणं समोर आली आहेत. तर दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर पुन्हा महाराष्ट्रातील अमरावती आणि अहमदनगर जिल्ह्याचा क्रमांक आहे. येथे क्रमश: 4250 आणि 3962 करोनाची प्रकरणं समोर आली आहेत.
बाराव्या क्रमांकावर तमिळनाडूतील चेन्नई असून येथे 3811 करोना बाधितांची नोंद झालीय. तेराव्या क्रमांकावर मुंबई जिल्हा आहे. येथे 3355 बाधितांची नोंद झाली. 14,15,16,17,18, आणि 19 व्या क्रमांकावर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, नांदेड, वर्धा आणि पंजाबमधील जालंधर जिल्हा आहे. येथे क्रमश: 3326, 3299, 3185, 3146, 2431, आणि 2424 करोनाबाधितांची नोंद झाली आहे.