राहाता – भारताच्या चांद्रयान-3 चे श्रीहरी कोटा येथून झालेले यशस्वी प्रक्षेपण हे इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कर्तबगारीचा मोठा आविष्कार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे द्योतक असल्याचे गौरवोद्गार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे महा जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहरात या अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माहितीचे पत्रक त्यांनी नागरिकांना वितरित केले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, मुकुंदराव सदाफळ, कैलास कोते, भाजपचे उपाध्यक्ष रघुनाथ बोठे, मोहन सदाफळ, दीपक रोहोम, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, प्रदीप बनसोडे, नानासाहेब बोठे, संजय सदाफळ, मेघना दंडवते आदी उपस्थित होते.
अमेरिका आणि रशिया या देशांबरोबरच आता भारतानेसुद्धा केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे देश आता बलशाली होत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या टीमने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे देशाची मान उंचावली आहे. एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात पाठविणे हाही विक्रम आज देशाच्या नावावर नोंदला गेला आहे. मागील 9 वर्षांत देशहितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच आता जगात भारताचे महत्त्व अधोरेखित झाल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
आजच पशुसंवर्धन विभागाने दुधाच्या दरवाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी नेमलेल्या समितीने प्रतिलिटर 34 रुपये भाव देण्याची केलेली शिफारस मान्य करून तसा आदेश सरकारने काढला असून, हे सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.