पुणे – इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे.
या परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकाल 3.11 टक्क्यांनी घटला आहे. परीक्षेसाठी 15 लाख 41 हजार 666 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 15 लाख 29 हजार 96 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एक किंवा दोन विषय नापास झालेल्या विद्यार्थ्यांना “एटीकेटी’ची सुविधा मिळाली असून, यात 33 हजार 306 विद्यार्थी आहेत.
नापास झाल्यास, कमी गुण मिळाल्याच्या कारणास्तव विद्यार्थी नैराश्येत जातात; अन् टोकाचे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतात. यातून नको त्या वाईट घटना घडत असतात. विद्यार्थ्यांची मानसिक दडपणातून सुटका व्हावी, यासाठी ऑनलाइन समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुढील आठ दिवस ही सुविधा सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीसाठी ही सेवा मोफत उपलब्ध असेल.