नवी दिल्ली – देशातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात चार महिन्यांमधील सर्वाधिक ४६९५१ रुग्ण सापडलेत. देशातील रुग्णसंख्या वाढत असतानाच करोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा वेगाने सुरु असून यामध्ये ६० वर्षांवरील व इतर आजार असलेल्याच ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आता या संदर्भात केंद्र सरकारने नवीन निर्णय घेतला आहे.
आता 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना 1 एप्रिलपासून करोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
तत्पूर्वी देशात सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेकच्या लसी वापरण्यात येत आहेत. नागरिकांना यापैकी कोणत्याही एका लसीचे दोन डोस घ्यायचे आहेत. यापूर्वी दोन डोस मधील अंतर २८ दिवस असावे असं केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आलं होत. मात्र आता हे अंतर ६ ते ८ आठवडे इतके असावे असं स्पष्ट केलंय. हा नवा नियम केवळ सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीसाठी असणार आहे.