जीव धोक्यात घालून 24 तास पोलीस ऑनड्युटीवर
– संजय कडू
पुणे – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर “साथ रोग नियंत्रण’ कायदा लागू झाला आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त हे यासंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन अमंलबाजवणीच्या सूचना देत असतात. पोलिसांचे काम त्यांच्या सूचनांचे पालन करणे इतकेच असते.
सध्या, शहरातील अनेक भाग कंटेन्मेंट झोनमधून वगळण्यात आला आहे. शहरातील बाजारपेठा आणि वाहतूकही सुरळीत करण्यात आली आहे. पोलिसांना ठिकठिकाणचे बॅरिकेट आणि बंदोबस्त हटवण्यास सांगण्यात आले आहे. मास्क न घालणाऱ्यांवरही कारवाईचे अधिकारही महापालिकेच्या यंत्रणेकडे आहेत. यामुळे मागील तीन महिने करोनाला रोखण्यासाठी जीवाचे रान करणारी पोलीस यंत्रणा सध्या रस्त्यावर कमी प्रमाणात दिसत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही पोलीस जीव धोक्यात घालून बंदोबस्त करत आहेत.
शहरात कायदा सुवस्था राखतानाच करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी मे महिन्यापर्यंत पोलिसांच्या खांद्यावर होती. नागरिकांना घराबाहेर पडू न देणे, जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवणे, भाजीपाला विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे, ई पास शिवाय प्रवासाला बंदी घालणे, वाहने विनाकारण घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करणे इतकेच नव्हे तर घराबाहेर पडणाऱ्यांना समज देणे, आदी सर्व जबाबदारी पोलिसांवर होती. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त जस जसे आदेश लागू करत होते, त्या सर्वांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. यानंतर मे महिन्याच्या अखेरीपासून अनेक बंधणे शिथील करण्यात आली.
कंटेनमेंट झोन वगळता उर्वरीत सर्व परिसर व्यवहारांसाठी नियमांतर्गत खुला करण्यात आला. सध्या, वेळेचे आणि समविषम तारखांचे बंधन घालून व्यवहार सुरू आहेत. यामुळे पोलिसांना फक्त कंटेन्मेंट झोनमध्येच बंदोबस्ताचे काम राहिलेले आहे. शहरातील उर्वरित भागात ध्वनिक्षेपकावरून मास्क लावण्यासंदर्भात आणि खरेदीसाठी सोशल डिस्टन्स ठेवण्यासंदर्भात पोलीस सूचना करीत आहेत.
दरम्यान, मागील तीन महिने पोलिसांचा रस्त्यावर खडा पहारा होता. तसेच, अनेक करोना विषाणूचे संक्रमण झालेल्या परिसरातही गस्त होती. इतर प्रशासकीय यंत्रणेपेक्षा पोलिसांचा सर्वसामान्य नागरिकांशी जास्त संपर्क होता. यामुळे पोलीस दलातील अनेकांना करोनाची लागण झाली. एक, दोन पोलीस ठाणी वगळता जवळपास सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्याची वेळ आली. एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोना मुक्तीसाठी शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पुणेकर कधीही विसरू शकणार नाहीत.