पुणे – शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग दि. 27 जानेवारीपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करूनच शाळा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून सुरू होणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पालकांची लेखी संमती घेऊनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक साबण, पाणी व शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
शाळेत क्वारंटाइन सेंटर असल्यास ते प्रशासनाने इतर ठिकाणी हलवावे. तसे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी, असे आदेशात नमूद केले आहे. वर्गखोली तसेच स्टाफ रूममधील बैठक व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील शाळा सर्व नियमांचे पालन करून सुरू होतील. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व नियमांचे काटेकोर पालन करून इतर उपाययोजना करण्यात येत आहेत.
– सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.