लखनौ – उत्तर प्रदेशातील करोना बळींची संख्या काही थांबताना दिसत नाही. करोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याने मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन करायला सुरुवात केली आहे.
सरकारने मनाई केल्यानंतरही लोक गंगेच्या काठावर मृतदेह पुरत आहेत. देशभरात नाचक्की झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदीकाठी मृतदेहांचे दफन करण्यास मनाई केली होती. मृतदेह दफन केल्यास किंवा नदीत सोडल्यास कारवाईचा इशारा देतानाच या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंगही करण्यात आली होती. मात्र सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत.
प्रयागराजच्या श्रृंगवेश्वर धामजवळ मृतदेहांना दफन करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे घाटावर सर्वत्र प्रेतच दिसून येत आहेत. पोलीसही हा सर्व प्रकार मूकदर्शक बघून बघत पाहत आहेत.