औरंगाबाद – करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून आतापर्यंत 2121 अर्ज करण्यात आले असून अजूनही अनेकांचे अर्ज येणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण 50 जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत. तर उर्वरीत अर्जांची छाननी सुरु आहे.
दरम्यान, करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, लोकांकडून कमी प्रमाणात अर्ज दाखल होत आहेत. तसेच जे अर्ज येत आहेत, तेदेखील अपूर्ण आहेत. आतापर्यंत 2121 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी केवळ 50 अर्जच पात्र ठरवण्यात आले असून मनपाच्या समितीने त्यांना मंजुरी दिली आहे. इतर अर्जांची छाननी सुरु आहे. मनपास्तरीय समितीने गुरुवारपासून वॉर रूममधून नागरिकांना फोन करून अर्ज कसे भरायचे यांसदर्भात माहिती देत आहेत.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे –
ऑनलाइन पद्धतीनेच या योजनेचे अर्ज भरले जात आहेत. या अर्जासोबत कोरोना रुग्णाचे मृत्यू प्रमाणपत्र, आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणीचा अहवाल, कँसल चेक आणि स्वयंघोषणापत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
दरम्यान, नागरिकांकडून आलेल्या अर्जांची चार स्तरावर पडताळणी केली जात आहे. जिल्हास्तर आणि महापालिका स्तरावरील पडताळणी होऊन मंजूर झालेली प्रकरणे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवली जात आहेत. त्यानंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणि तेथून पुणे येथील राज्यस्तरीय समितीकडे ती वर्ग करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे चार पातळ्यांवर मंजुरी मिळाल्यानंतर थेट कुटुंबियांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा होणार आहे.