नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला सामोऱ्या जात असलेल्या भारतात एक दिवसात आणखी 1 हजार 72 बाधित दगावले. त्यामुळे देशातील करोनामृतांच्या एकूण संख्येने शुक्रवारी 5 लाखांचा टप्पा ओलांडला. तो नकोसा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.
जगात सर्वांधिक करोनाबाधितांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. त्या देशात आतापर्यंत 9 लाख 20 हजारहून अधिक बाधित दगावले आहेत. त्याखालोखाल ब्राझीलमध्ये 6 लाख 30 हजार बाधित मृत्युमुखी पडले आहेत. भारतात 2 ऑक्टोबर 2020 या दिवशी करोनामृतांची एकूण संख्या 1 लाखावर पोहचली.
त्यानंतर मागील वर्षी (2021) 27 एप्रिलला ती संख्या 2 लाखांवर पोहचली. त्या संख्येला 3 लाखांचा टप्पा ओलांडण्यास अवघा महिनाभराचा कालावधी लागला. मागील वर्षीच 23 मे यादिवशी ती नोंद झाली.
त्यानंतर मागील वर्षीच्याच 1 जुलैला देशातील करोनामृतांची संख्या 4 लाखांवर गेली. त्या पुढील टप्प्यासाठी (5 लाख) 217 दिवसांचा कालावधी लागला. तो कालावधी करोनामृतांच्या संख्येत 1 लाखाची भर पडण्यासाठी सर्वांधिक ठरला आहे.