मंचर -पुणे आणि मुंबईचा बहुतांश भाग करोनामुळे लॉकडाऊन झालेला आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातून तरकारी पीक पाठवता येणे अशक्य आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम होऊन तरकारी मालाला बाजारभाव नसल्याने त्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
करोना विषाणूमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोष्टीचा आढावा घेऊन करोनावर मात करण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची मुदत 17 मेपर्यंत वाढवली आहे. या लॉकडाऊन काळात आंबेगाव तालुक्यातील बहुतांश बाजार समित्या आणि विविध गावांचे बाजारही बंद आहेत, त्यामुळे शेतांमध्ये पिकविलेला शेतीमाल विकणेही शेतकऱ्यांसाठी गैरसोय झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यात पाणी मुबलक असल्याने शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे गुरांसाठी ओला चाराही आहे; पण सध्या मात्र, शेतात पिकलेल्या मालाला बाजार नसल्याने हाच शेतीमाल गुरांसाठी वापरला जात असल्याचे चित्र तालुक्यात अनेक ठिकाणी दिसत आहे. करोनाच्या या संकटामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून पुणे, मुंबई शहरात करोना महामारी वाढतच चालली असल्याने लॉकडाऊन अजून किती दिवस राहतो किंवा वाढतो, याबाबत शेतकरी
अनभिज्ञ आहे.
उत्तर पुणे जिल्ह्याला फटका
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई यांना वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे की, नवी मुंबईमधील अन्नधान्य, मसाला, फळ व भाजी मार्केट व कांदा, बटाटा मार्केट नवी मुंबई येथे करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे विषाणूचा संसर्ग प्रकार रोखण्यासाठी संपूर्ण अन्नधान्य, मसाला व फळभाजी मार्केट आणि कांदा, बटाटा मार्केट बंद करण्यात आले.
नवी मुंबई बाजार समितीमध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातून दररोज 500 हून अधिक ट्रक भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी जात असतात. सद्यःस्थितीत बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतीमाल विक्रीसाठी जाणार नाही, परिणामी हा माल शेतातच राहणार असल्याने याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसणार आहे, यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सध्या शेतात तयार झालेला शेतीमाल विकायचा कोठे, हा प्रश्न शेतकऱ्यांना चिंता देणारा ठरला आहे. मध्यंतरी दुष्काळ, त्यानंतर गारपिट आणि आता करोना विषाणूमुळे लॉकडाऊन अशा बिकट परिस्थितीत शेतकरी सापडलेला आहे. शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे. बाजार समित्या बंद असल्यामुळे शेती मालाला उठाव नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या या काळात उत्पादित केलेली तरकारी पिके गुरांसाठी चारा म्हणून सोडून दिली आहेत. डोळ्यादेखत उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. दरवर्षी काही ना काही संकट बळीराजासमोर येत आहे आणि त्यात तो भरडला जात आहे.