“आई आपल्याकडे डांबराच्या गोळ्या आहेत?’ तन्वीने तिची ऑनलाइन शाळा होताच आईला प्रश्न केला.
“हो, आहेत ना. कशाला हव्यात?’
“अगं, आज मॅडमनी एक प्रयोग करायला सांगितला आहे. त्यासाठी डांबराच्या गोळ्या किंवा कापूर हवा आहे.’
“अच्छा! काय करणार आहात पण?’
“तसं काहीच करायचे नाही. म्हणजे मी 4-5 गोळ्या एका ताटलीत 24 तास ठेवणार आहे. तर 4-5 गोळ्या एका बंद डब्यात आणि या 24 तासांत काय काय होते आहे, त्याचे निरीक्षण करायला मॅडमनी सांगितले आहे. काहीच करायचे नाही. हाच प्रयोग आहे म्हणे. उद्याच्या तासाला सगळ्यांनी त्यांची निरीक्षणे सांगायची आहेत. त्यानंतर त्या निरीक्षणांवर मॅडम माहिती देणार आहेत.’
“तन्वी, प्रयोगाचे काय निरीक्षण होते?’
“अगं आई, त्या ताटलीतील गोळ्या सकाळी लहान झाल्या होत्या. प्रणवने ताटलीत कापूर ठेवला होता. सकाळी पाहिला तर जवळपास नव्हताच म्हणे त्यात. म्हणजे सगळ्यांनाच असे जाणवले की बंद डब्यातीत पदार्थ जसे होते तसे होते पण ताटलीत ठेवलेल्या पदार्थांचा आकार लहान झाला होता. किंवा ते शिल्लकच राहिले नव्हते.’
‘अच्छा! मग मॅडम काय म्हणाल्या?’
“त्यांनी या क्रियेचे नाव सांगितले… अं… संप्लवन. हं बरोबर स्थायूचे थेट वायूत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला संप्लवन म्हणतात.’
“एकदम बरोबर, पण हे कशामुळे होते हे माहीत आहे का?’
“कशामुळे?’
“उष्णतेमुळे.’
“मी कुठ डांबराच्या गोळ्यांना उष्णता दिली होती?’
“हो. तू त्यांना वेगळी उष्णता नव्हती दिलीस. त्यांना हवेतील उष्णता पुरेशी होती. त्यामुळे डांबराच्या गोळ्यांचे वायूत रूपांतर झाले. अन्न शिजवतानाही पदार्थांना उष्णता देतो म्हणजेच अन्नपदार्थही ती उष्णता घेतात. म्हणजे बघ हं, सिलेंडरमधून बाहेर येणारा गॅस, गाडीतील पेट्रोल असे कोणतेही इंधन उष्णता बाहेर टाकतात व ही उष्णता वापरली जाते काम करण्यासाठी. संप्लवन, बाष्पीभवन म्हणजेच द्रवाचे वाफेत रूपांतर होणे या सगळ्या क्रियांमध्ये उष्णता शोषली जाते. म्हणूनच पाण्यापेक्षा वाफ जास्त गरम असते. मग मला सांग बर माठातले पाणी कसे काय थंड होते?’
“उष्णता शोषली गेली की पदार्थ गरम होतात. म्हणजे माठातल्या पाण्यातून उष्णता बाहेर पडत असणार. पण एक शंका आहे. डांबराच्या गोळ्या हवेतील उष्णता शोषून घेतात. भांड्यात जर पाणी असेल तर ते कोमट होते. म्हणजे तेही उष्णता शोषून घेत असणार. मग माठातल्याच पाण्यातून उष्णता बाहेर कशी काय पडते?’
“अरे वा! छान शंका विचारलीस की. माठ मातीचा असल्याने सच्छिद्र असतो. म्हणून त्यातून पाणी पाझरते. बरोबर?’
हे पाणी माठाबाहेर येताना माठातील पाण्याची ऊर्जा वापरते. तसेच पाझरलेल्या पाण्याचे हवेतील उष्णतेने बाष्पीभवन होते. माठाचे पाझरणे आणि त्या पाझरलेल्या पाण्याची वाफ होणे म्हणजेच बाष्पीभवन होणे या दोन्हीमुळे माठातील पाणी थंड होते. आता तुला संप्लवन म्हणजे काय आणि उष्णता शोषून घेतल्यावर तसेच उष्णता बाहेर पडल्यावर काय होते व आता एका प्रश्नांचे उत्तर शोध. काल तुला इंजेक्शन देण्याआधी तेथे बोळ्याने स्पिरीट लावलं. काय कारण असेल?’
– विशाखा गंधे