कामाच्या व्यापात असणाऱ्या सर्व मित्रांनी नुकतेच एक छोटेसे गेट टुगेदर आयोजित केले होते. पुण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही सर्वजण भेटलो. गप्पा रंगल्या आणि सर्वच जण जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागले. काही वेळाने सर्वांनी जेवणाची ऑर्डर दिली. प्रत्येकाने आपापल्या पसंतीचे पदार्थ मागवले. वेटरने आम्ही मेन्यू कार्डमधून निवडलेले पदार्थ आणून दिले. बराच वेळ लोटला असल्याने सर्वांना भूक लागली होती.
सर्वांनी भोजनावर यथेच्छ ताव मारायला सुरुवात केली. मात्र आमच्यापैकी एका मित्राने अगदी मोजक्याच घासांत आपले भोजन आटोपले. आम्ही सर्वांनी त्याला खूप आग्रह केला परंतु त्याने नम्रपणे नकार दिला. मोजक्याच शब्दांत तो म्हणाला, “पोट भरेल इतके मी खाल्ले आहे. आता आतला आवाज सांगतोय की बस्स’ आम्ही सर्वांनी मात्र पुन्हा आपला मोर्चा त्या स्वादिष्ट पदार्थांकडे वळविला.
तो अविस्मरणीय दिवस सरला; पण मनात एक ती अर्थपूर्ण ओळ सारून गेला. “आतला आवाज’ हा शब्द अनेकदा आपण आपल्या संभाषणात वापरत असतो. हा आतला आवाज म्हणजे कुठेतरी आपले मन आपल्याला त्याबाबत सूचना देत असते. आतला आवाज म्हणजेच आपल्या अंतर्मनातून आपल्याला दिली जाणारी स्वयंसूचना. बऱ्याचदा ही स्वयंसूचना ओळखणे आपल्याला कठीण जाते.
कारण या स्वयंसूचनेला कसलाही आवाज नसतो किंबहुना ती आकाशवाणीप्रमाणे होत नाही. तर आपल्या शरीरातील आपले विचार आपल्या भावना नियंत्रित करणारे आपले सचेतन मन आपल्याला संदेश देत असते. यात एखाद्या गोष्टीबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक सूचना दडलेल्या असू शकतात. परंतु हा आतला आवाज आपल्याला ओळखता आला पाहिजे. परंतु अनेकदा आपण नशीब, दैववाद, अंधश्रद्धा किंवा चमत्कारिक शक्तीची अपेक्षा करतो. परंतु आपल्या आतील आवाजाला महत्त्व देत नाही. मुळात आपला आतील आवाज, अंतर्मनाचा आवाज हा एखाद्या देवदूतापेक्षा कमी नसतो हे आपल्या लक्षात येत नाही.
एकदा एका गुरुकुलातील तीन शिष्य आपले शिक्षण पूर्ण करून अंतरवासितेसाठी बाहेर पडतात. गुरुजींनी दिलेला ज्ञानाचा ठेवा सोबत घेऊन ते जंगलातून प्रवास करीत असतात. वाटेत जे मिळेल ते खाऊन पुढच्या पल्ल्याच्या दिशेने वाटचाल करीत असतात. एके दिवशी ते खूप चालतात पण कुणाला काहीही खायला मिळत नाही. तिघांच्या पुंजीमध्ये आता केवळ एक भाकरी राहिलेली असते.
आता ती कोणी कशी वाटून खायची याचा पेच असतो. शेवटी गुरुजींची शिकवण आठवून ते एक निर्णय घेतात. तिघेही झोपायचा निर्णय घेतात आणि ज्याच्या स्वप्नात देवदूत येऊन भाकरी खाण्याचा आदेश देईल तेवढी भाकरी त्याने खायची असे ठरते. तिघेही रात्री झोपी जातात. पहाटे तिघांना जाग येते. त्यातील पहिला शिष्य सांगू लागतो, “माझी भक्ती आणि मला तोंडपाठ असलेले श्लोक पाहून देवदूताला आनंद झाला आणि त्याने मला ही भाकरी खाण्यास सांगितले आहे.’
दुसरा शिष्य म्हणतो, “मी केलेली प्राणिमात्रांची सेवा पाहून देवदूतांनी त्या भाकरीवर माझाच हक्क असल्याचे सांगितले.’ तेवढ्यात तिसरा शिष्य गंभीरतेने म्हणतो, “माझ्या स्वप्नात देवदूत आले नाहीत. कारण भुकेमुळे मला झोपच लागली नाही. मात्र मध्यरात्री मला माझ्या अंतरआत्म्याचा आवाज आला आणि त्याचे ऐकून मी ती भाकरी संपवून टाकली.’
दोघेही त्याच्यावर रागावत त्याला विचारतात, “पण मग तू आम्हाला सांगितले का नाहीस?’
त्यावर तो शांतपणे उत्तरतो, “तुम्ही गाढ झोपेत देवदूताला आमंत्रण देण्यात व्यस्त होता. परंतु त्या अंतर्मनातील देवदूताने माझी झोप हिरावून एकप्रकारे मला भाकरी खाण्याचा आदेश दिला आणि मी धन्य झालो.’
आपण आपला आतील आवाज ऐकत नाही आणि मग त्यातून आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. म्हणूनच आपल्याला अंतर्मनाचा आवाज ऐकू आला पाहिजे. योग्य-अयोग्य, फायदे-तोटे, संधी-निराशा आणि हर्ष-दु:ख याबाबतची आतून आलेल्या हाकेला योग्य प्रतिसाद द्यायला हवा. इतरांच्या मतमतांतरांना बाजूला ठेवून आतल्या देवदूताचा आवाज ऐकला पाहिजे. मनाचा आवाज ऐकण्यासाठी स्व-संवाद साधणे, मनाला प्रश्न विचारणे, आत्मपरीक्षण करणे, विचारांशी संवाद साधणे आदी गोष्टी कराव्या लागतील. जर आपल्याला आपल्या यशाचा आवाज वाढवायचा असेल तर आपल्याला आपल्या मनाचा आवाज हा ऐकावाच लागणार आहे, हे मात्र नक्की.
सागर ननावरे