नवी दिल्ली – खासगी शाळा मोठ्या प्रमाणात फी आकारणी करीत आहेत. त्यामुळे गरीब पालक त्रस्त झाले असून देशाच्या विविध भागांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे अशी तक्रार आज विविध पक्षांच्या खासदारांनी राज्यसभा सभागृहात मांडण्यात आली. शुन्य प्रहरात भाजपचे श्वेत मलिक यांनी हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की आता काही उद्योगपतीच शैक्षणिक क्षेत्रात शिरले असून त्यांनी शिक्षण संस्था मध्ये नफा कमावणाऱ्या फर्म बनवल्या आहेत. हे संस्था चालक अक्षरश गरीबांचे रक्त शोषून घेत आहेत. शाळेच्या इमारतीच्या नावाने, कधी पुस्तके आणि युनिफॉर्मच्या नावाने पालकांकडून अव्याच्यासव्या पैसा उकळला जात आहे.
समाजवादी पक्षाचे सुरेंद्र सिंग नागर म्हणाले की उत्तरप्रदेशात तर खासगी शाळांच्या फी मध्ये किमान दीडशे टक्के फी वाढ करण्यात आली आहे. मुलांचे व पालकांचे हे शोषण थांबवण्यासाठी सरकारने काहीं कायदेशीर उपाययोजना केली पाहिजे.अन्य सदस्यांनीही या विषयावर सहमती दर्शवून सरकारकडे फी नियंत्रण उपाययोजनांची मागणी केली.
आज राज्यसभेतील शुन्य प्रहरात विविध पक्षाच्या सदस्यांनी अन्यही विषय उपस्थित केले. पीएमकेचे पी विल्सन म्हणाले की वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ओबीसीं विद्यार्थ्यांना आरक्षण मिळत नाही. कॉंग्रेसचे पी भट्टाचार्य यांनी ऑर्डनन्स फॅक्टरींचे खासगीकरण थांबवण्याची सुचना केली.