भोर (पुणे) ः वरंधा घाटातील महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संरक्षक भिंत गेल्या आठवड्यात कोसळली होती, त्यामुळे हा भाग धोकादायक झाला आहे. या मार्गावर संध्याकाळनंतर सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोकादायक रस्त्याबाबत परिसराभतील नागरिक सांगत असतानाही त्यांचे न ऐकता कंटेनरचालकाने घाटात कंटेनर घातला आणि ट्रक वळवताना त्याचा अंदाज चुकल्याने हा ट्रक रस्त्याच्या मध्येच आडकला. ही घटना बुधवारी (दि. 9) सकाळी घडली. कोसळलेल्या कड्याजवळच हा सर्व प्रकार झाल्याने चालकाला ट्रक वळवणे अशक्य झाल्याचे दिसत होते. ट्रकने रस्ता आडवला गेल्याने दुचाकीसुद्धा या घाटातून जाणे अशक्य झाले. महाडच्या सार्वजनिक विभागाने जेसीबीच्या साह्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.