बारामती – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संघटना बांधणीची दोर बारामतीकराच्या हाती आल्याने बारामतीचे महत्त्व राजकीय पटलावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 2009मध्ये पक्षाची जोशात स्थापन केली. त्यांचे भाषण, मराठी व प्रेमापोटी त्यांच्यावर जनेतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, त्यानंतरच्या काळात त्यांना ओहोटी लागली आणि अनेक निष्ठावान मनसैनिकांनी राज ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर मनसे आता पुन्हा नव्या जोशात आणि नव्या रंगात समोर आली आहे.
मुंबईत गुरुवारी (दि. 23) झालेल्या पक्ष मेळाव्यात मनसेने आपला विविध रंगातील झेंडा बदला असून त्याची जागा आता केवळ हिंदू धर्माचे प्रतिक असणाऱ्या भगव्या रंगाने घेतली असल्याने मनसेची पुढची वाटचाल केवळ “हिंदू’धर्मावर आधारित असल्याचा संदेश जनतेमध्ये निर्माण झाला आहे.
दरम्यान, मनसेचे अनेक निष्ठावन कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना “बायबाय’ करीत पक्षांतर केले आहे. मात्र, मनसेच्या स्थापनेपासूनच बारामतीचे ऍड. सुधीर पाटसकर हे राज ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. त्यांच्या निष्ठेची दखल घेत त्यांच्यावर आता संघटनात्मक बांधणीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मनसेची बांधणी आता एका बारामतीकराच्या हातून होणार असल्याने पुणे जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नव उत्साह संचारला आहे.
राजकीय वर्तुळात “ती’ चर्चा रंगली
राज ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संबंध मध्यल्या काळात अधिक मधुर झाले होते. तर राज ठकरे हे शरद पवारांचे “प्यादे’ असल्याची टीकाही त्यावेळी राज ठाकरेंवर करण्यात आली होती. मात्र, ज्यापद्धतीने सर्व पक्षातील नेते पवारांकडून विविध राजकीय सल्ले घेतात त्यापद्धतीनेच राज ठाकरे हे सुद्धा पवारांकडून राजकीय सल्ले घेतात असे सांगितले जाते. त्याच पवारांच्या बारामतीतील ऍड. सुधीर पाटसकर यांच्यावर खुद्द राज ठाकरे यांनी नव्याने संघटना बांधण्याची जबाबदारी सोपविली असल्याचे मुंबईत गुरुवारी झालेल्या मेळाव्यात जाहीर केल्याने मनसेची मोर्चेबांधणी आता बारामतीतून होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ओहोटीच्या कारणाचा अभ्यास केल्याचा अंदाज मनसेची स्थापना होऊन 14 वर्षे पूर्ण होत आली आहेत. या काळात मनसेने अनेक चढ उतार पहिले आहेत. मनसेने सुरुवातीला जी आश्वासकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता; त्याला नंतर ओहोटी लागली आहे. या ओहोटीचे कारण शोधणे सध्या गरजेचे असून त्याचा अभ्यास करूनच ऍड. पाटसकर यांना संघटना बांधणीचे दोर हाती दिले असण्याची शक्यता आहे. आता ऍड. पाटसकर या संधीचे सोने करून मनसेनेला नवी उभारी र्निमाण करून सत्तेचा वनवास संपवायला हातभार लावतील व बारामतीचे नाव राजकीय पटलावर मनसेच्या नावाने अधोरेखीत करतील, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.