लोणावळा – संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. लोणावळा शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहर भाजप कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. याशिवाय मानव अधिकार संरक्षण संघटना, लोणावळा यांनी देखील संविधान दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भाजप शहराध्यक्ष अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक देविदास कडू, विजय सिनकर, विशाल पाडाळे, ललित सिसोदिया, सरपंच सनी कडू, भाजपचे जेष्ठ नेते राजू दळवी, बाबू संपत, हर्षल होगले, अर्जुन पाठारे, जयप्रकाश परदेशी, नवीन भुरट, अभय पारख, नंदू जोशी, परिजा भिलारे, विजया मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे आपल्या देशासाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकांसाठी किती महत्त्वाचे आहे, तसेच संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला दिल्या जाणाऱ्या हक्का सोबतच प्रत्येक नागरिकासाठी घालून दिलेलं कर्तव्य कशी बजावली गेली पाहिजे याबाबत भाजपचे जेष्ठ नेते अरविंद कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मानव अधिकार संरक्षण संघटना, लोणावळा व मावळ कमिटीच्या वतीने संविधान दिनानिमित्त शहरातील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले, तसेच मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा शिळावणे, तालुका अध्यक्ष सुमित निकाळजे, कार्याध्यक्ष निरंजन कांबळे, उपाध्यक्ष सोमदत्त शिंदे, सचिव जे. जे. गरड, शहराध्यक्ष योगेश पैलकर, कार्याध्यक्ष हर्षद राणे, उपाध्यक्ष उदय बोभाटे, सचिव करण गरुडे, हाजी अब्बास खान आदींसह मान्यवर उपस्थित होते.