सातारा – शिवसेनेचे नगर विकास मंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे 17 आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याने मुंबईमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. या भूकंपामध्ये गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे दोघे आऊट ऑफ कव्हरेज गेल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
सातारा शहरातील शिवसेना कार्यालयांमध्ये प्रचंड सन्नाटा असून जिल्हा कार्यकारिणीच्या बऱ्याच नेत्यांनी याविषयी मौन बाळगले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला चांगलाच धोबीपछाड दिला आहे. भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच जागा निवडून आणत शिवसेना आणि कॉंग्रेसची मते फोडण्यात यश मिळवले.
त्यानंतर एकनाथ शिंदे 17 आमदारांसह सुरत येथे पोचल्याने राजकीय वर्तुळामध्ये मोठा भूकंप झाला. शिंदे यांनी दिलेल्या उमेदवारांची नावे यादीतून डावलण्यात आल्याने हे नाराजी नाट्य प्रकर्षाने समोर आले आहे. शिंदे 17 आमदारांसह गुजरातकडे रवाना झाल्याने ठाकरे सरकार अल्पमतात येऊन पडणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या वर्तुळात सुरू झाली. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि गृहराज्यमंत्री व शंभूराज देसाई यांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणांची पडताळणी करून भाजपमधून शिवसेनेत गेलेले महेश शिंदे म्हणायला शिवसेनेत असले तरी ते भाजपच्या गोतावळ्यात रमलेले असतात. महेश शिंदे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे आमदार असले तरी शिंदे यांची भाजपची सलगी कोणापासूनही लपून राहिलेली नाही. एकनाथ शिंदे आणि महेश शिंदे यांच्यातील राजकीय सलगी वेळोवेळी दिसून आली आहे.
कोरेगाव नगरपंचायतीच्या विविध कामांसाठी नगरोत्थान तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एकनाथ शिंदे यांनी सढळ हस्ताने त्यांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय लागेबांधे चांगलेच दृढ झाले आहेत. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई पाटणचे आमदार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि मर्जीतले नेते म्हणून शंभूराज देसाई यांची ओळख आहे.
त्यामुळे त्यांची गृह राज्यमंत्रीपदी वर्णी लागली होती मात्र ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झाल्याची चर्चा सुरू झाल्याने पाटण तालुक्यातही देसाई समर्थक अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी इतके जवळचे संबंध असताना गृह राज्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ का द्यावी या त्यांच्या भूमिकेबद्दल विलक्षण आश्चर्य व्यक्त होत आह.े सातारा शहरातील शिवसेना कार्यालय तसेच कार्यकारिणीच्या काही सदस्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता बरेच सदस्य तातडीने मुंबईला रवाना झाल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील हेसुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झालेआहेत. शिवसेनेचे सातारा शहर कार्यालय दिवसभर बंद होते.
शिंदेंसोबत 37 आमदार असतील तरच…
एखाद्या राजकीय पक्षाच्या संख्याबळातील दोन तृतीयांश भाग जर अन्य पक्षात विलीन होण्यास सहमत असेल तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार या गटावर कारवाई केली जाऊ शकत नाही. विधीमंडळातील शिवसेनेचे आताचे संख्याबळ 55 आहे. जर बंडखोर गटाला भारतीय जनता पार्टीत विलीन व्हायचे असेल त्यांची संख्या 37 असणे आवश्यक आहे. सुरूवातीच्या माहितीनुसार 12 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्यांना 37 आकडा गाठणे आवश्यकच आहे. शिंदेंसोबत नक्की किती आमदार आहेत त्याबाबत संदिग्धता आहे. मात्र त्यांना किमान 20 जणांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.