नगर – राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच “मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळी चांगलाच गोंधळ उडाला. या प्रकाराचे पडसाद आता उमटत आहेत. कॉंग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या नाटकाला संरक्षण देणार आहे. गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
या नाटकाला संरक्षण देण्याचे काम कॉंग्रेस पक्ष करील. मंगळवारी रात्री नाटकाचा प्रयोग सुरू असताना काही समाजकंटकांनी गोंधळ घालत प्रयोग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कलाकारांवर हल्ला करण्याचा देखील हेतू होता काय, हे तपासण्याची गरज आहे. या प्रकारामुळे कलाकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामागे कोणते विकृत समूह अथवा लोक आहेत, याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी यावेळी कॉंग्रेसने केली. राज्य नाट्य स्पर्धा ही शासनाची स्पर्धा आहे. आक्षेप असणाऱ्यांनी त्यांचा आक्षेप सेन्सॉर बोर्डाकडे किंवा योग्य त्या व्यासपीठावर नोंदवावा, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी शहरातील कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या प्रकारामुळे राज्य नाट्य स्पर्धेच्या सुरुवातीलाच गालबोट लागले आहे.