नवी दिल्ली – आसाम विधानसभेची २०२६ ची निवडणूक येईपर्यंत कॉंग्रेस पक्षात केवळ मुस्लिम आमदारच शिल्लक राहतील अशी बोचरी टीका आसाम राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते हिमंता बिस्व सरमा यांनी केली आहे.
विश्वनाथ जिल्ह्याच्या गोहपूर येथे माध्यमांशी बोलताना सरमा म्हणाले की रकीबुल हुसैन, रकीबुद्दीन अहमद, जाकीर हुसैन सिकदर, नुरूल हुदा आणि काही अन्य आमदारच कॉंग्रेस पक्षात राहतील.
दरम्यान, कॉंग्रेसचे आसाम प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष राणा गोस्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. यासंदर्भात सरमा यांना विचारले असता ते म्हणाले की राणा कॉंग्रेसचे शक्तीशाली नेते आहेत. ते जर भारतीय जनता पार्टीत येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री सरमा यांचा माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या प्रती जो व्यवहार आहे तो पाहता ते मला घाबरतात हेच सिध्द होते असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. ते म्हणाले सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले त्यांचे बंधु आणि भावजय यांची राज्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बदली करण्यात आली आहे.
भारत न्याय जोडो यात्रेवरील हल्ल्यानंतर आपण आपली सुरक्षा वाढवण्यात यावी अशी विनंती केली होती. मात्र अद्याप तेही करण्यात आलेले नाही. आमच्यावर हल्ला करणारे सर्रास मोकाट फिरत आहेत असा आरोप करून बोरा म्हणाले की ही उदासीनता भीतीचे संकेत देणारी असून ते (सरमा) जर कोणाला घाबरत असतील तर तो फक्त मी आहे आणि याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबासोबतची त्यांची वागणूकच हे सिध्द करते आहे. त्यांना प्रशंसा करणारे नाही तर गुलाम पसंत आहेत अशी टीकाही बोरा यांनी केली.