नवी दिल्ली – देशातील सगळ्यांत जुन्या कॉंग्रेस पक्षाने बुधवारी आपला 138 वा वर्धापन दिन साजरा केला. ऍलन ह्यूम यांनी 1885 मध्ये 28 डिसेंबर रोजी कॉंग्रेस पक्षाचा पाया रचला होता. व्योमेश चंद्र बॅनर्जी तेव्हा कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 मध्ये कॉंग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या लोकसभेच्या निवडणुका लढल्या होत्या. त्यात 401 पैकी 361 जागा जिंकून या पक्षाने इतिहास रचला होता. तब्बल 45 टक्के मते मिळवून तेव्हा देशात नेहरू युगाची सुरूवात झाली होती.
त्यानंतर 1957 च्या निवडणुकीतही पक्षाची कामगिरी अगोदरपेक्षा चांगली झाली. 403 पैकी 371 जागा पक्षाने जिंकल्या आणि जादाची 2.8 टक्के मतेही मिळवली. अर्थात कॉंग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी 47 टक्क्यांपर्यंत पोहोचली. 1962 आणि 1967 च्या निवडणुकीतही कॉंग्रेसच्या जागा वाढल्या. मात्र पूर्वीपेक्षा कामगिरी खराब झाल्याची नोंद झाली. तेव्हा अनुक्रमे मतांची टक्केवारी 44 टक्के आणि 40 टक्के होती. 1971 च्या निवडणुकीत जवळपास 43 टक्के मते पुन्हा मिळाली.
1977 मध्ये पहिला हादरा
1977 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पहिला झटका बसला. आणीबाणी हटवल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत कॉंग्रेसला 543 पैकी केवळ 154 जागा मिळाल्या आणि मतांची टक्केवारी 34 पर्यंत घसरली. मात्र तीनच वर्षांनी पुन्हा झालेल्या निवडणुकीत पक्षाने आपले स्थान पुन्हा भक्कम करत 42.7 टक्के मतांसह 353 जागा जिंकल्या.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्सुनामी
इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या 1984 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला तब्बल 415 जागा मिळाल्या आणि त्यावेळी मतांची टक्केवारी होती 48.1. या ऐतिहासिक विजयानंतर पक्षाला उतरती कळा लागली. नंतर पक्ष सत्तेत आला. मात्र त्यांच्या मतांच्या टक्केवारीत सातत्याने घसरण होत गेली. 1989 मध्ये कॉंग्रेसला 197 जागा मिळाल्या आणि मते होती 39 टक्के. तर 1991 मध्ये त्यांनी 244 जागा जिंकल्या आणि मिळालेली मते होती 36 टक्के.
सोनिया गांधींचा कालखंड
सोनिया गांधी यांनी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली असताना 1998 मध्ये कॉंग्रेसचे सूत्रे स्विकारली. त्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत पक्षाला 141 जागा मिळाल्या तर मतांची टक्केवारी आणखी खाली म्हणजे 25 टक्क्यांपर्यंत घसरली. 1999 मध्ये पुन्हा या पक्षाला 114 जागा आणि 28.3 टक्के मते मिळाली. तर 2004 मध्ये 145 जागा आणि 26.5 टक्के मते मिळाली. 2009 मध्ये कांग्रेसची कामगिरी सुधारली. पक्षाने 200 चा आकडा पार करत 206 जागा जिंकल्या आणि मतांची टक्केवारी पुन्हा 28 पर्यंत गेली.
2014 पासून पतन
2014 मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार गेले आणि कॉंग्रेसला उतरती कळा लागली. 2014 आणि 2019 च्या निवडणुका कॉंग्रेससाठी अत्यंत वाईट होत्या. यातील काही काळात राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होते. 2014 च्या नरेंद्र मोदी लाटेत कॉंग्रेसचे पानिपत झाले व केवळ 44 जागा जिंकल्या. त्यांची मतांची टक्केवारी होती अवघे 19 टक्के. 2019 च्या निवडणुकीतही जेमतेम 52 जागा जिंकता आल्या आणि मतांचा आकडा 19.5 टक्क्यांवरच स्थिर राहीला.