सातारा -“मोदी हटाओ, देश बचाओ, लोकशाही बचाओ’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “पोस्टकार्ड कॅम्पेनिंग’ करत विविध प्रश्न विचारणारी पत्रे पाठविण्यास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रदेश कार्यकारी सदस्य अजितराव पाटील- चिखलीकर, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडीक, महिला कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सौ. छायादेवी घोरपडे, प्रदेश प्रतिनिधी अन्वर पाशाखान, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, मनोजकुमार तपासे, सुषमाराजे घोरपडे, रजिया शेख, मालन परळकर आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्यात आली. डॉ. सुरेश जाधव म्हणाले, “”जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने पंतप्रधान मोदी यांना एक लाख पत्रे पाठवण्यात येणार आहेत. मोदींनी आश्वासनांची पूर्तता करावी आणि अदानींच्या आर्थिक घोटाळ्यांची निःपक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे आहे.
त्याबरोबर देशात दररोज मोठे- मोठे घोटाळे होत असून संबंधित घोटाळेबाज मोकाट आहेत. घोटाळ्यांना चाप लावून घोटाळे केलेल्यांना कडक शासन करावे.”मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण ना आश्वासनांची पूर्तता करत आहात, ना घोटाळेबाजांना शासन करताना दिसत आहात. अदानीच्या आर्थिक भानगडींची आपण जेपीसीमार्फत चौकशी कधीपासून सुरू करणार आहात?
केंद्र सरकार अदानीच्या जेपीसी चौकशीपासून पळ का काढत आहे? एसबीआय आणि एलआयसीला अदानीच्या आर्थिक भानगडीमुळे धोका निर्माण झाला असून त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय उपाययोजना केली आहे? निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चौक्सी, विजय मल्ल्या यांना पकडून देशातील न्यायव्यवस्थेसमोर केव्हा हजर करणार आहात? आदी स्वरूपाचा मजकूर या पत्रात आहे. आपले सरकार देशातील सामान्य माणूस, शेतकरी, कामगार, सैनिक, शिक्षण क्षेत्र, उद्योजक व्यापारी व नोकरदार यांच्याविरोधी काम करणारे असून आपण जनतेचा विश्वास गमावला आहे, असेही पत्रात म्हटले आहे.