पुणे – गोड आणि रसाळ कोकणातील हापूस आंब्याला यंदा अवकाळी पाऊस, त्यानंतर वाढलेल्या उष्णतेचा फटका बसला आहे. नेहमीच्या तुलनेत 30 ते 40 टक्केच उत्पन्न निघणार आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत हापूसची आवक कमी झाली आहे. हंगामही लवकर संपणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहोर लागण्यास सुरूवात होते. मात्र, त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास मोहोर गळतो. पुन्हा मोहोर लागण्याची प्रक्रिया काळीकाळ थांबत असते. त्यानुसार डिसेंबर, जानेवारीमध्ये ही प्रक्रिया थांबली होती. मात्र, त्यानंतरही मोहोर चांगला लागला होता. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, उष्णतेचा परिणाम झाला आणि काही फळांवर डाग पडले. तर, अनेक ठिकाणी कैऱ्या पडल्या. परिणामी, उत्पादन घटले आहे. अवकाळी पावसातून सावरल्यानंतर उष्णतेमुळे हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांचे पीक गेले.
सर्वसामान्यांना चाखता येणार नाही चव
दरवर्षी सुरूवातीला हापूसचे दर चढे असतात. साधारणपणे 15 एप्रिलनंतर आवक वाढते. भावात घसरण होते. त्यावेळी सर्वसामान्य नागरिक हापूसची चव चाखतात. मात्र, यंदा हापूसची आवक कमी आहे. परिणामी, भाव चढेच राहणर आहेत. त्यामुळे आधीच महागाईने ग्रासलेल्या सर्वसामान्यांना यंदा हापूसची चव परवडणार नसल्याचे चित्र आहे.
अवकाळी पावसामुळे हापूसचा हंगाम लांबला. त्यानंतर तापमानात वाढ झाली. मागील आठवड्यातही 38 ते 39 अंश तापमान होते. परिणामी, कैऱ्या पिवळ्या होऊन गळाल्या आणि उत्पन्न घटले आहे. हंगामही लवकर संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
– मकरंद कान्हे, गणपतीपुळे, जि. रत्नागिरी.
मागील आठवड्यात मार्केट यार्डातील फळ विभागात सुमारे 4 हजार पेटी आंब्याची आवक होत होती. त्यामध्ये घट होऊन आता अडीच ते तीन हजार पेटी आवक झाली आहे. भाव मात्र स्थिर आहेत. बदलत्या हमानाचा परिणाम झाल्यामुळे येत्या काळात आवक घटणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
– अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड.