यशवंत पाचंगे : रांजणगाव गणपती येथे कार्यकर्त्यांची बैठक
रांजणगाव गणपती- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकारी वा कार्यकर्त्यांकडून आघाडीचा धर्म पाळण्यात येणार आहे. आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना शिरूर तालुक्यातील 39 गावांमधून 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा एकमुखी निर्धार करीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वळसे पाटील यांच्या ऐतिहासिक विजयात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असेल, असे आंबेगाव-शिरूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या बैठकीत पाचंगे बोलत होते. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर, शिरूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, उपाध्यक्ष अप्पासाहेब धुमाळ, अशोक भुजबळ, विजय डिंबर, शिरूर शहराध्यक्ष ऍड. किरण आंबेकर, अमजद पठाण, उद्योजक अभय सुराणा, लक्ष्मण सांबारे, आदिनाथ नवले, भाऊसाहेब टाव्हरे, जगन्नाथ देवकर, अण्णासाहेब शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभव यादव म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर झालेल्या चर्चेनुसार राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा खजिनदार महेश ढमढेरे व उपाध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणेच एकदिलाने व प्रामाणिकपणे मदत करणार आहे. शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केवळ निवडणुकीपुरते विचारात न घेता अन्य निवडणुकांत काम करण्याची संधी देणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमवेत कॉंग्रेस व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनासन्मानाची वागणूक देण्यात येईल.
ऍड. किरण आंबेकर म्हणाले की, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची महिनाभरात भेट घेऊन लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थितीत सन्मान करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
- आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांचे मताधिक्य वाढविण्याकरिता राष्ट्रवादीबरोबर कॉंग्रेस व मित्रपक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने कामाला लागावे.
-ऍड. प्रदीप वळसे-पाटील, संचालक, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना - 39 गावांतून 50 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य देणार
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या कामकाजाबद्दल राज्यात समर्पक चर्चा असताना आपण त्यांना मतदान करण्यात मागे न राहता या विधानसभा निवडणुकीत आंबेगाव मतदारसंघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील 39 गावांतून सुमारे 50 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य देण्याचा निर्धार आम्ही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला असल्याचे शिरूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव यांनी सांगितले.