नागपूर – काँग्रेस नेते सुनील केदार यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी नवा अर्ज केला आहे. नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज नाकारला आणि त्यांच्या पाच वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर सुनील केदार यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
२२ डिसेंबर रोजी नागपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने सुनील केदार यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दोषी मानत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीनुसार केदार यांची आमदारकी रद्द झाली होती. त्यामुळे केदार यांनी या प्रकरणी जामीन आणि शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केले होते. मात्र कोर्टाने ते नाकारले होते.
दरम्यान, कोर्टाने बँक घोटाळ्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडित आहे असे सांगत सुनील केदार यांना जामीन देण्यास नकार दिला होता. तसेच, त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिले होते. त्यानंतर आता सुनील केदार यांनी या प्रकरणी वकिलामार्फत उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आता नागपूर खंडपीठात होणाऱ्या सुनावणी दरम्यान न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सुनील केदार समर्थकांचे लक्ष लागले आहेत.