नवी दिल्ली: राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत १० जनपथवर पोहचले आहेत. हे नेते राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून ६ दिवस झाले तरी देखील राज्यात स्थिर सरकार स्थापन झाले नाही.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार १० जनपथवर पोहचले आहेत. महाराष्ट्रातील निकालानंतर सोनिया गांधी यांच्या बरोबरची हि पहिलीच भेट आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.
जर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर शिवसेनेचे ६२ काँग्रेसचे ४४ आणि राष्ट्रवादीचे ५४, असे एकूण १६० संख्याबळ शिवसेनेकडे होऊ शकते. मात्र दिल्लीत सोनिया गांधींशी नेमकी काय चर्चा होणार आणि काँग्रेस सत्ता सथापनेबाबत काय निर्णय घेणार?, हे महत्वाचे ठरणार आहे.