मुंबई: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजपमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. अशातच आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असे वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी राजकीय धमकी देण्याचा प्रयत्न करून लोकांना घाबरविण्याचे काम सुरू आहे. लोकांनी दिलेल्या कौलाचा अपमान करण्यासाचे काम भाजपा करत आहे.
महायुतीला पूर्ण जनादेश मिळून सुद्धा भाजप-शिवसेना स्थिर सरकार देण्यात अपयशी ठरले तर महाराष्ट्र राज्यातील समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर सोडविण्यासाठी राज्याला पर्यायी सरकार देण्याचा नक्कीच विचार केला जाईल. बेजबाबदारीला जबाबदारपणाने उत्तर देण्यात येईल, असे मलिक म्हणाले.