लखनौ – अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता थोडाच अवधी राहीला असताना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. जे काम आता होते आहे ते खरेतर खूप पूर्वीच व्हायला हवे होते.
मात्र पूर्वीच्या सरकारांनी न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडली नाही. त्यामुळे अयोध्येचा मुद्दा इतके वर्ष न्यायालयात प्रलंबित राहीला. मात्र आता अयोध्येत न्याय आणि सत्याची स्थापना होते आहे. अयोध्येच्या संदर्भात काही लोकांनी द्वेषाची भावना ठेवली, मात्र आता अयोध्येचे वैभव परत येते आहे असे योगींनी म्हटले आहे.
कॉंग्रेसला लक्ष्य करताना ते म्हणाले की १९८९ मध्ये आपल्या निवडणूक अभियानाची सुरूवात कॉंग्रेसने अयोध्येतूनच केली होती. रामाच्या नावावर मतपेढीचे राजकारण तर कॉंग्रेसनेच केले आहे. आता कॉंग्रेसला या कार्यक्रमात येण्यापासून कोण रोखते आहे? आम्हाला प्रत्येक बाबीसाठी पुरावे द्यावे लागले. आम्ही कनिष्ठ न्यायालयात गेलो, उच्च न्यायालयात गेलो आणि सर्वोच्च न्यायालयातही गेलो.
अखेर सुप्रीम कोर्टात मंदिराच्या बाजूने निर्णय आला. राम मंदिराच्या कळसाच्या अगोदर प्राणप्रतिष्ठा होते आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका केली जाते आहे. मात्र या टीकेचा समाचार घेताना योगी म्हणाले की, अयोध्येत जे काही केले जाते आहे ते शास्त्रानुसारच केले जाते आहे. मंदिराच्या ट्रस्टने सर्व धर्माचार्यांना निमंत्रण पाठवले आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपेक्षा कोणीही धर्माचार्य मोठा नाही.
ही वेळ श्रेय घेण्याची नाही. अयोध्येला गतवैभव प्राप्त होते आहे. ही आता एक नगरी राहीली नसून संपूर्ण जगाची सांस्कृतिक राजधानी झाली आहे. आमचा प्रभू रामावर पूर्ण विश्वास होता की मंदिर होईल. जर भगव्यात एवढे आकर्षण असेल तर आमची इच्छा आहे की पूर्ण देश भगवामय होवो.
योगी म्हणाले की आज अयोध्येत शहरात चौपदरी रस्ता आहे. शहराच्या जवळच अत्यंत सुसज्ज रेल्वेस्थानक आहे. पूर्वी अत्यंत लहान सहान गाड्यांसाठी एक छोटी रेल्वेलाइन असलेले स्थानक येथे होते. आज अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाले आहे. या शहराचा एवढा विकास होईल अशी कल्पनाही दहा वर्षांपूर्वी कोणी केली नसती. ज्या शरयू नदीच्या तीरावर अगोदरच्या सरकारांनी गोळीबार केला तेथे आम्ही क्रूझ चालू केल्या आहेत.