ग्वालियर – शेतकरी आंदोलनाच्या विषयावरून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कॉंग्रेसवरच जोरदार तोंडसुख घेतले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेस पक्ष या आंदोलनाच्या आडून राजकारण करीत आहे. त्यांना शेतकऱ्यांच्यावतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. शेतकऱ्यांचे हे आंदोलन काही मर्यादित ठिकाणीच सुरू आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली. त्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसने सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीच केले नाही असा आरोप करून ते म्हणाले की सन 2019 च्या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातही त्यांनी आम्ही जे कायदे आणले त्याच आशयाच्या कृषी सुधारणा लागू करण्याची ग्वाही दिली होती असा दावाही त्यांनी केला.
आज कॉंग्रेसने या विषयावरून घुमजाव करून त्यांनी शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना पुढे करून कॉंग्रेसने जे राजकारण सुरू केले आहे त्यात ते यशस्वी होणार नाहींत असेही तोमर यांनी यावेळी सांगितले.
ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते. तोमर यांना शेतीतील काहीही कळत नाही अशी टिका कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे त्या विषयी विचारले असता तोमर म्हणाले की दिग्विजयसिंह यांना कॉंग्रेस पक्षही गांभीर्याने घेत नाही.