नवी दिल्ली – यावेळी लोकसभा निवडणूक जिंकायचीच अशा इराद्याने कॉंग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली आहे. अगदी ग्राउंड लेव्हलला काम करत तेथील मुद्दे समजून घेऊन ते मांडण्याचा एकीकडे पक्षाचा प्रयत्न असून दुसरीकडे पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेद्वारे थेट मतदारांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आपल्या या सत्ताप्राप्तीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कॉंग्रेस पक्षाने आणखी पाच गॅरेंटी अर्थात हमी मतदारांना दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी स्वत: सोशल मीडियावर त्याची घोषणा केली आहे.
कॉंग्रेसच्या गॅरेंटी :-
१. आरोग्य अधिकार: नागरिकांना आरोग्याचा अधिकार प्रदान करणारा कायदा केला जाणार असून त्या अंतर्गत सगळ्यांना मोफत तपासणी, औषधे आणि उपचार केले जातील.
२. श्रम सन्मान: प्रत्येकाला प्रतिदिन किमान ४०० रूपये वेतन देणार. यात मनरेगाच्या मजुरांचाही समावेश.
३. शहरी रोजगार हमी कायदा: शहरांमध्ये पायाभूत सुविधा आणि वातावरण बदलाच्या मुद्द्यावर फोकस करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार.
४. सामाजिक सुरक्षा: असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जीवन विमा आणि अपघात विमा योजना आणून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाणार.
५. सुरक्षित रोजगार: मोदी सरकारच्या कामगार विरोधी कायद्याची समिक्षा करणार. महत्वाच्या सरकारी कार्यालयांतील कंत्राटी कामगार भरती बंद करणार. खासगी क्षेत्रांतील कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणार.
या गॅरेंटींची घोषणा करत राहुल गांधी म्हणाले की भारत घडवणाऱ्यांना त्यांचा हक्क प्रदान करत कॉंग्रेस पक्ष राष्ट्रनिर्मितीचा पाया मजबूत करेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सामाजिक सुरक्षा प्राप्त झालेले कामगार उत्पादन क्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रात क्रांती आणि गती आणतील. मजबुत कामगार देशाची शक्ती बनतील.