पाटणा – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आधी कॉंग्रेसवर निशाणा साधल्यानंतर आता त्या पक्षाविषयी नरमाईची भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसला आम्ही अजूनही राष्ट्रीय पातळीवरील पर्याय मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.
बिहारमधील मित्रपक्ष असणाऱ्या कॉंग्रेस आणि राजदमधील संबंध ताणले गेले आहेत. त्या राज्यातील विधानसभेच्या दोन जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिले. त्यामुळे त्यांच्यातील बेबनाव उघड झाला. त्यानंतर लालूंनी दोन दिवसांपूर्वी थेट कॉंग्रेसच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त होण्यासाठी त्या पक्षाला जागा सोडायच्या का, असा सवाल त्यांनी केला. मात्र, मंगळवारी लालूंनी कॉंग्रेसला सुखावणारी भूमिका मांडली. कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. साहजिकच तो भाजपला पर्याय आहे.
राजदइतकी मदत कुणीच कॉंग्रेसला केलेली नाही, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाली. बिहारमध्ये दोन्ही पक्षांत तणाव निर्माण होण्याचा ठपका त्यांनी कॉंग्रेसच्या काही प्रभावहीन नेत्यांवर ठेवला.