थिरूवनंतपूरम – केरळमध्ये बुधवारी तब्बल 31 हजार 445 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्या राज्याने 3 महिन्यांनंतर पुन्हा एका दिवसातील 30 हजारी बाधितांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे केरळमधील स्थिती संपूर्ण देशाची चिंता वाढवणारी ठरत आहे.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या घटत आहे. मात्र, केरळमध्ये उलटे चित्र आहे. देशात करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिला जात आहे. अशात केरळ चिंतेचा विषय ठरत आहे. त्या राज्यात याआधी 20 मे यादिवशी 30 हजारहून अधिक बाधित आढळले होते. दरम्यान, करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून कॉंग्रेस आणि भाजपने केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे.
राज्यातील करोना नियंत्रण यंत्रणा अपयशी ठरत आहे. करोना संकटाची तीव्रता वाढूनही राज्य सरकार आरोग्यविषयक तपशील दडवत आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी काय करावे तेच सरकारला उमजत नसल्याचे दिसते, असे टीकास्त्र कॉंग्रेसने सोडले.
तर, करोना फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केरळ सरकारकडून अपुरे प्रयत्न होत आहेत. ते सरकार केवळ लपवाछपवी करण्यात व्यस्त आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला.