संतोष पवार
सातारा – प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे मुबलक पाणी मिळावे, पाण्याची टंचाई कमी होऊन गावे टॅंकरमुक्त व्हावीत यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनापर्यंत 75 गावांमध्ये ही योजना पूर्ण करण्याचा प्रशासनाचे प्रयत्न होते. प्रत्यक्षात 80 गावांमध्ये “हर घर जल’ योजना पूर्णत्वास गेल्याने अनेक गावे टॅंकरमुक्त होणार आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर जल’ योजनेतून गावांचा प्रशासनाने आराखडा तयार केला. निवडलेल्या गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, नवीन स्त्रोत्र निर्माण करणे, प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देणे हे उद्दिष्ट ठेवून योजना राबवण्यात आली. अनेक ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत. “हर घर जल उत्सव’ विशेष मोहीम नुकतीच राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील 75 गावांमध्ये 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक कुटुंबाला पाण्याचे नळ कनेक्शन देण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात 80 गावांमध्ये ही योजना राबवून प्रशासनाने आघाडी घेतली आहे. त्यानुसार आखाडे, दुदुस्करवाडी, मोळेश्वर, शिंदेवाडी, पिंपळी (सर्व ता. जावळी), अंबवडे, देलेवाडी, डिचोली, गोटेवाडी, खोडशी, लटकेवाडी, लोहारवाडी, पाचपुतेवाडी, राजमाची (सर्व कराड), अंदोरी, माने कॉलनी, म्हावशी, पळशी, सांगवी, शेखमिरवाडी (ता. खंडाळा), दहिवड, गोरेगाव वांगी, जांब, कामथी तर्फ परळी, मुसांडेवाडी, पाचवड, पुनवडी, सुर्याचीवाडी (ता. खटाव), बेलेवाडी, बोधेवाडी, चिलेवाडी, मोरबेंद,
रणदुल्लाबाद, सायगाव एकंबे, शिरढोण, सुलतानवाडी, सुर्ली, विखळे( ता. कोरेगाव), दानवली (महाबळेश्वर), बोथे, दानवलेवाडी, देवापूर, महाबळेश्वरवाडी, मनकर्णवाडी, नरवणे (ता. माण), जाईचीवाडी, मान्याचीवाडी, विठ्ठलवाडी (ता. पाटण), बोडकेवाडी, ढवळेवाडी, गोळेवाडी, कोऱ्हाळे, माझेरी, शिंदेमाळ, वेळोशी, वाघोशी (ता. फलटण), आष्टी नं.1, भरतगाव, देशमुखनगर, धोंडेवाडी, फत्यापूर, गोजेगाव, जाधववाडी, जिहे, काळोशी, किडगाव, माळ्याचीवाडी, मापरवाडी, नुने, सोनापूर, वळसे, विजयनगर (ता. सातारा), आंबेदरा, भिवडी, दरेवाडी, मुगाव, पानस, परतवडी, व्याहळी कॉलनी (ता. वाई) या गावांतील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात आले आहे. ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.