नारायणगाव -जुन्नर तालुक्यात 23 ते 25 जुलै दरम्यान पडलेल्या अति पावसामुळे व वादळाने नुकसान झालेल्या भागातील पंचनामे तात्काळ करावेत. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अति पाऊस व वादळी वाऱ्यामुळे आदिवासी भागातील कोल्हेवाडी, खिरेश्वर, करंजाळे, खामगाव, शिरोली तर्फे कुकडनेर, घाटघर, येणेरे, खानगाव, सुकाळवेढे, तळेराण, कोपरे, मांडवे या भागात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तसेच वादळामुळे महावितरणचे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलही पडले आहेत. या वादळामध्ये माणिकडोह, अंजनावळे, खामुंडी, कोपरे या भागातील अंगणवाडी, शाळा, समाज मंदिरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे व वादळाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. कोल्हेवाडी येथे भूस्खलन व खामगाव मांगणेवाडी येथील भूस्खलनबाबत सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. अतिपावसामुळे व वादळाने नुकसान झालेल्या परिसराची मी स्वतः
अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केलेली असून, जुन्नर तालुक्यातील अतिपावसाने व वादळाने नुकसान झालेल्या भागातील पंचनामे तात्काळ करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.