शिर्डी -शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिरात असलेली फूल-हारांवरील बंदी तूर्तास कायम असून फूल-हारांवरील निर्बंधाबाबत सर्वंकष धोरण ठरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर याबाबत सरकार पातळीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशा शब्दांत राज्याचे महसूल, दूग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी ग्रामस्थांना आश्वस्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून भाविकांच्या भावनांचा आणि श्रद्धेचा विचार करून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महसूलमंत्र्यांनी शनिवारी शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व शिर्डी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. या बैठकीला संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे तसेच संस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, की मंदिरात फुल-हार विक्रीबाबत दोन मतप्रवाह आहेत. यात ग्रामस्थांचीही काही भूमिका आहे. फुल उत्पादक शेतकरी व विकेत्यांची ही काही भूमिका आहे. यामुळे या मुद्द्यावर घाई-घाईने निर्णय होण्यापेक्षा सुवर्णमध्य ठरवून निर्णय होणे रास्त आहे. यासाठी सर्वंकष धोरण ठरविणे गरजेचे आहे. तेव्हा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीत संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक व जिल्हा कृषी अधीक्षक यांचा समावेश असणार आहे. या समितीने आपला अहवाल 30 दिवसांच्या आत सरकारला सादर करायचा आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
शंभर टक्के गुन्हेगारी मुक्त करा
शिर्डी शहर व परिसर शंभर टक्के गुन्हेगारीमुक्त झाला पाहिजे. सोनसाखळी चोरी, गुंडगिरी, अवैध व्यवसाय, भाविकांची लूट, अवैध धुम्रपान, चरस-गांजा-गुटखा विक्री यासारख्या अनेक गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. झिरो टॉलरन्स धोरण राबवून पोलिसांनी गुन्हेगारांचा समूळ बंदोबस्त करावा. गुन्हेगारी विषयावर पुन्हा बैठक घेण्याची वेळ येऊ देऊ नये, अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी पोलीस विभागाला दिल्या.