पूजा झाली, आरती, प्रसाद झाला आणि आता जेव्हा गुरुजींना दक्षिणा द्यायची वेळ आली तेव्हा एका यजमानांनी गुरुजींना विचारले, “”गुरुजी दक्षिणा किती द्यायची?”
यजमानांचा तो प्रश्न ऐकला आणि लगेच गुरुजींनी उत्तर दिले, “”तुम्हाला हवे तेवढे द्या”. गुरुजींचे ते उत्तर ऐकले मात्र आणि यजमान जरा चिंतेत पडले की काय आणि किती दक्षिणा द्यायची? तेव्हा त्यांची ती संभ्रमित झालेली अवस्था ओळखून गुरुजी त्यांना म्हणाले, “”हे पाहा, तुम्हाला किती दक्षिणा द्यायची हा जो प्रश्न पडलाय ना तो पडताच कामा नये. कारण हे बघा की, दान, दक्षिणा देणं ही एक प्रकारची तुम्ही तुमच्या उद्याचा लाभासाठी आज केलेली पेरणी आहे.
आता तुम्ही तुमच्या कर्माच्या शेतात काय पेरायचं हे तुम्ही विचारपूर्वक ठरवायला हवं. कारण, निसर्गाचा नियम हाच आहे की तुम्ही आज जे पेराल तेच उद्या भविष्यात आणि तसंच उगवणार आहे. आज तुम्ही जर तुमच्या शेतात बासमती तांदूळ लावतात, तर भविष्यात तुमच्या घरात पोत्यांतून तोच येणार आहे. मी आज बागेत आंब्याचे झाड लावले आणि त्याला पुढे चिक्कू किंवा पेरू आले असे होत नाही. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की निसर्गाचा, देवाच्या घरचा न्याय नियम हा असा आहे की तुम्ही आज जे मुठीने द्याल ते तो उद्या तुमच्या पदरात त्याच्या कितीतरी पटीने देणार आहे.
हे लक्षात ठेवायला हवं की, जे आणि जेवढं आपल्याला मिळायला हवं ते आणि तेवढं त्याने प्रथम दुसऱ्याला द्यायला शिकायला हवं. मग ते तुमचं प्रेम असेल, सुख असेल, आनंद असेल, समाधान असेल किंवा काहीही. कारण जे इतरांना भरभरून प्रेम देतात, त्यांनाही ते आणि तेवढं भरभरून परत मिळत असतं. जे इतरांना आनंद देतात, जे इतरांच्या गालावरची आसवे पुसून फुले फुलवतात. त्यांना त्यांच्या बदल्यात देवही तेच देतो.
आता आपण याचा विचार करायला हवा की, मला काय आणि किती हवं आणि जेवढं मला हवं तेवढं मी इतरांना द्यायला नको? कारण सढळ हातांनी जे आज देऊ तेच उद्या आपल्या ओंजळीन मिळणार हे विसरून असे चालेल. म्हणून आजचं तुमचं देणं हे दुसऱ्याला सुखावेल, समाधानी करेल असे असायला नको का?’
अरुण गोखले