बारामती, (प्रतिनिधी)- बारामतीत दि. २ मार्च रोजी होत असलेल्या नमो महारोजगार मेळावा व विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत येत आहेत. त्याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता अतिथी देवो भव, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
सुळे म्हणाल्या की, गेल्या पाच दशकांत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गव्हर्नर यांनी बारामतीमध्ये हजेरी लावली आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या परिसरात होत असलेला महारोजगार मेळावा हा पाच जिल्ह्यांसाठी आहे. पुणे, नगर, सोलापूरचा त्यामध्ये समावेश आहे.
90 लोक नोकरीसाठी भेटतात
महागाई, बेरोजगार यावर लक्ष वेधताना सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारने दोन कोटी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात 43 हजार नोकऱ्या देत आहेत, अशी टीका देखील सुळे यांनी मोदी सरकारवर केली. राज्यात महागाई, बेरोजगारी, दुष्काळ असे चित्र आहे. मला भेटणारे शंभरपैकी 90 लोक नोकरीसाठी भेटतात. असेही सुप्रिया सुळे यांनी सांगून बेरोजगारीची समस्यांची वस्तुस्थिती मांडली.