भारतीय औषध उद्योगाची जगभरातील प्रतिमा ही निश्चितच चांगली असून विश्वासार्हतेच्या बाबतीत आपला देश अन्य देशांहून सरस आहे. मात्र भारतीय औषधांच्या गुणवत्तेवर काही देशांनी शंका व्यक्त केल्याने देशातील औषधी उद्योगाच्या विश्वासार्हतेला धक्का पोचू शकतो. अशावेळी औषध उद्योगाला अडचणीत आणणाऱ्या घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
भारताने माहिती आणि तंत्रज्ञानानंतर औषधनिर्मिती उद्योगामध्ये जगभरात नावलौकिक मिळवला आहे. जेनेरिक औषध तयार करण्याबरोबरच जगभरात कमी दरात ही औषधे उपलब्ध करून दिल्याने अनेक देशांतील लाखो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. चीनमध्ये करोनाचे नवीन संकट उद्भवलेले असताना इंटरनेटवर सर्चिंग करून चिनी नागरिक करोनावर उपचार करणाऱ्या आणि स्वस्त असलेल्या भारतीय औषधाला प्राधान्य देत आहेत, ही बाब भारतासाठी अत्यंत अभिमानाची म्हणावी लागेल. कोविड काळात संपूर्ण जग आत्मकेंद्रीपणाने वागत असताना भारताने कोविड लसी आणि हायड्रोक्लारोक्वीन सारख्या औषधांचा पुरवठा करत आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती जगाला आणून दिली.
भारतीय औषधांचा बोलबाला होत असताना उझबेकिस्तानच्या घटनेने पुन्हा एकदा धक्का बसला. एका भारतीय औषधी कंपनीचे कफ सिरपचे प्राशन केल्याने या देशातील 18 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तत्पूर्वी 2022 च्या प्रारंभी गाम्बिया येथे भारतीय कफ सिरप घेतल्याने सुमारे 70 मुलांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला होता. या दोन्ही घटनांतून भारतीय औषध उद्योगाच्या विश्वासर्हतेवर प्रश्न उपस्थित केले गेले. एरव्ही अशा घटनांचे खापर संबंधित देशातील औषधांची तपासणी आणि चाचपणी करणाऱ्या व त्यानुसार मागणी करणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर फोडले जाते किंवा औषधांच्या निकषाचे पालन न केल्याच्या कारणावरून रुग्णालाच जबाबदार धरण्यात येते. पण या प्रकरणात औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना जबाबदार धरले जात आहे.
गाम्बिया प्रकरणात ठपका ठेवलेल्या कंपनीला आपल्या देशात क्लिन चिट देण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारच्या दोन-चार घटना या भारतीय औषधी उद्योगाला अडचणीत आणणाऱ्या आहेत. अर्थात जगभरात भारतीय औषधांची तयार झालेली प्रतिमा किंवा विश्वासार्हता एक दोन वर्षातली नाही तर अनेक वर्षांपासूनची मेहनत यामागे आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आणि तो गैर नाही. अर्थात यामागे काही कंपन्यांचा निष्काळजीपणा देखील कारणीभूत असू शकतो. परदेशात पाठविण्यात येणाऱ्या औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता याबाबतचे निकष कितपत पाळले जातात, याबाबतचा औषधी कंपन्यांनी केलेला खुलासा पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र त्याचे आकलन करणे फारसे कठीण नाही. देशाच्या प्रकृतीनुसार औषधी कंपन्या औषधातील फॉर्म्युलात थोडा फार फरक करत असण्याची शक्यता आहे. दुसरे म्हणजे निष्काळजीपणा.
यासंदर्भात 2019 मध्ये समोर आलेला एक खुलासा धक्कादायक आहे. यात म्हटले, की सरकारकडून वेळोवेळी पोलिओ लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो. यानुसार देशातील लाखो-कोट्यवधी मुलांना पोलिओचे दोन थेंब दिले जातात. पण या डोसमध्ये टाइप-2 पोलिओ व्हायरस होता आणि ही बाब कोणालाच समजली नाही. या खुलाशाला मार्च 2019 मध्ये सेंट्रल ड्रग्ज लॅबरोटरी (सीडीएल) ने देखील दुजोरा दिला. त्यांच्या मते, 2016 रोजी उत्तर प्रदेश आणि तेलंगणात राबविलेल्या पल्स पोलिओमध्ये व्हायरस होता. टाइप-2 व्हायरस आता जगातून नाहीसा झाला असल्याचे गृहित धरून या कंपन्यांनी त्याची तपासणी केली नव्हती. अशा प्रकारचा निष्काळजीपणाचे दुष्परिणाम कोणाला भोगावे लागतील? अर्थात याचे उत्तर सर्वश्रूत आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये अमेरिकेच्या अन्न आणि औषधी प्रशासनाने (एफडीए) ल्यूपिन लिमिटेड या भारतीय औषध कंपनीला एक इशारेवजा पत्र पाठविले. या पत्रात म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील तारापूर येथील कंपनीत तयार होणाऱ्या औषधात निकषांचे पालन झालेले नाही. या औषधात वापरलेली सामग्री एपीआयमध्ये (औषध तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल) भेसळ आढळून आली आणि त्यामुळे अमेरिकी औषधाच्या नियमांचे उल्लंघन झाले.’ अमेरिकी प्रशासन हे नागरिकांचे आरोग्य, औषध तसेच खानपानाबाबत खूपच सजगता बाळगते. परिणामी या देशात औषधांची काटेकोरपणे तपासणी केली जाते. दुसरीकडे गाम्बिया आणि उझबेकिस्तानसारख्या देशात तपासणीची प्रक्रिया फारशी कठोर नसते. अशा वेळी या कंपन्यांना कठोर चाचण्यांतून मुक्तता मिळते. पण त्यातूनच बाळांच्या दुर्दैवी मृत्यूसारखा खळबळजनक प्रकार घडतो. अर्थात भारतीय सरकारच्या समितीने गाम्बियाला कफ सिरपचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला क्लिन चिट दिली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने औषधांचा अवयवांवर होणाऱ्या परिणामाबाबत प्रश्न उपस्थित केले.
भारतीय औषध उद्योगाची जगभरातील प्रतिमा ही निश्चितच चांगली असून विश्वासार्हतेच्या बाबतीत आपला देश अन्य देशांहून सरस आहे. जगात तिसऱ्या क्रमांकांचा भारतीय फार्मा उद्योग हा जगातील एकूण निर्यातीत 20 टक्के वाटा उचलतो. तसेच स्वस्त जेनेरिक औषधांचा भारत सर्वात मोठा निर्माता आहे. अशावेळी औषध उद्योगाला अडचणीत आणणाऱ्या घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र त्यावर पांघरूण टाकण्याचे काम केले तर आपल्या विश्वासार्हतेला आणखी धोका होऊ शकतो.
डॉ. संजय वर्मा