रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत काल कमाल तापमान 9.4 अंश सेल्सियसपर्यंत घसरले. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात जाड धुक्याची चादर पसरल्याने रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली.
दृश्यमानता शून्यापर्यंत घसरल्याने काही विमान उड्डाणे आणि रेल्वेगाड्या रद्द झाल्या. काहींचे मार्ग वळवण्यात आले, तर काहींना विलंब झाला. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीतील थंडीची लाट ओसरेल. 4 जानेवारीनंतर तापमान सर्वसामान्य होण्यास सुरुवात होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
जम्मू-कश्मीरमधे श्रीनगर इथे उणे 6.5 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. थंडीमुळे दल सरोवर गोठले आहे.
उत्तर प्रदेशात सोनभद्र जिल्ह्यात चुर्क इथे 8.0, तर राजस्थानात सिकर इथे उणे 5.0 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.