नगर – दररोज बदलणाऱ्या हवामानामुळे या वर्षीच्या रब्बी पिकांच्या हंगामावर मोठा परिणाम होत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगा काळ्या पडत आहेत. गव्हावर देखील काही ठिकाणी खोड माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याच प्रमाणे काही भागातील हरभरा पिकावर घाटी अळी पडत आहे. परिणामी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्याला औषध फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.
गेल्या आठवड्यापासून वातावरणातील बदल, धुके आणि पावसाच्या सरी पडत असल्याने त्याचा तूर, हरभरा, गहू पिकावर परिणाम होत असून जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. तुरीचे फुले गळतीला लागले असून त्याचबरोबर हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे खरिपासह रब्बी पिकावरही वातावरणाचे ग्रहण लागले आहे.
यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामातील पीक काढणीच्या अवस्थेत असतांना परतीचा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली. मात्र, यंदाच्या रब्बी हंगामाच्या लागवडीपासूनच वातावरण पिकांसाठी पोषक राहिले नाही. कडाक्याची थंडी, अचानक येणारे ढग, पिकांची फुले जाळणारी धुके पडत असल्यामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे.
या वर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे मुबलक पाणी आहे. त्यामुळे गेल्या हंगामात झालेले आर्थिक नुकसानीची कस रब्बीच्या हंगामात भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर प्रादूर्भाव पडल्याचे दिसून येत आहे. या वातावरणाचा फळभाज्या पालेभाज्यांवर देखील मोठा परिणाम होत आहे. वातारणातील बदलामुळे पिकाचे नुकसान होत आहे.
शासनाकडून मदतीची आस
यंदा ओल्या दुष्काळामुळे परिसरातील शेतकरी होरपळून निघत आहेत. यंदा सुरुवातीला कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र, त्यानंतर पावसाने जबदस्त हजेरी लावल्याने खरिपातील कांदा, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद यापिकासह जवळपास सर्वच पिके हातची निघूण गेली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून अतिवृष्टीची आर्थिक मदत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही. वातारणातील बदलामुळे गहू, संत्रा, हरभरा व तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्याला मदतीची आस आहे.
परतीचा पाऊस आणि आता वर्षाच्या शेवटी अचानक वाढलेली थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याच्या पिकासह अन्य रब्बी हंगामातील पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.
केतन येवले युवा शेतकरी